शैला कुलकर्णी-बाक्रे, मीरारोड
कोकण म्हटलं की रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग अशी अनेक निसर्गसौंदर्यानं नटलेली ठिकाणं डोळ्यासमोर तरळतात. म्हणूनच आम्ही मैत्रिणींनी एकदा कोकण सहल काढायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे निघालो. रिमा, रश्मी, भाग्यश्री, नम्रता, मी आणि आमची सर्वांत लहान मैत्रीण श्रद्धा अशा सहाजणी निघालो. खूप गप्पा, गोष्टी, धमाल करत सकाळी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो.
स्टेशन बाहेर आलो तर वैभव दादा गाडी घेऊन हजर होतेच. त्यांची ओळख करुन घेतली. कारण सर्व प्लॅनिंग फोनवरच झालं होतं. ते पावसचे रहिवासी आहेत. त्यामुळे तेथून पुढच्या प्रवासाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही गणपती बाप्पाचं स्मरण करून गणपतीपुळे गाठलं. तेथून थेट पावस गाठलं. मध्ये-मध्ये खाण्या-पिण्याची चंगळ होतीच. पुढे स्वरुपानंद स्वामींचं मठ बघून रात्री भक्तनिवासमध्ये विश्रांती घेऊन सकाळी तारकर्लीला निघालो.
जाताना आडवळणाचे रस्ते, दोन्ही बाजूस खोल दरी, घनदाट जंगल, आजूबाजूला उंचच उंच डोंगर पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. वाटेत कुणकेश्वर मंदिर, भराडि देवी असे दर्शन घेत तारकर्ली गाठलं. समुद्राच्या ढोपरभर पाण्यातही न गेलेल्या आम्ही वयाच्या साठाव्या वर्षी पाण्यात मनसोक्त डुंबलो. बोटिंग, बनाना रायडिंग, सोफा रायडिंग या सर्वाचा मनमुराद आनंद लुटला. आम्ही केलेली धमाल कॅमेऱ्यात कैद करायला श्रद्धा तयार होतीच. याहून खरा थरारक अनुभव घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग करायला वळलो. बोटीतून समुद्राच्या मध्यभागी गेलो. तोपर्यंत काहीच वाटलं नाही. पण जसं पाण्यामध्ये उतरलो तशी धडधड वाढली. रंगीबेरंगी माशांची अद्भुत दुनिया पाहून मी थक्क झाले. हा एक थरारक, रोमांचक पण तितकाच स्वप्नवत अनुभव होता. जो जीवनात एवढ्या वर्षात कधीच घेतला नव्हता. हे सर्व करत असताना तेथील नौकाचालक, स्कूबा ट्रेनर, आमचे वैभव दादा आणि एकूणच ज्या सर्वंनी वेळोवेळी सहकार्य केलं ते पाहून परकेपणाची भावना कधीच मनाच आली नाही. 'येवा कोकण आपलाच असा' असं का म्हणतात ते तेव्हा उमगलं.
तिसऱ्या दिवशी रत्नागिरी दर्शन केलं. थिबा पॅलेस, भगवती बंदर, लोकमान्य निवास, आरेवारेचा समुद्रकिनारा अशी अनेक दर्शनीय स्थळं पाहून परतीच्या प्रवासाला लागलो. ही कोकण ट्रीप खूपच संस्मरणीय ठरली.