अ‍ॅपशहर

कंक्राळ्यावर तोरण बांधलं

आमच्या गडवाट परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्रीमधील दुर्गांवर तोरण बांधायचा उपक्रम केला जातो. त्यांतर्गत यंदा किल्ले कंक्राळा इथे तोरण बांधायचं आम्ही ठरवलं.

Maharashtra Times 21 Jul 2016, 1:56 am
अमोल देशमुख,जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trip to kankrala fort
कंक्राळ्यावर तोरण बांधलं


आमच्या गडवाट परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्रीमधील दुर्गांवर तोरण बांधायचा उपक्रम केला जातो. त्यांतर्गत यंदा किल्ले कंक्राळा इथे तोरण बांधायचं आम्ही ठरवलं. दसऱ्याच्या आदल्या दिवशी मंगेश बावीस्करच्या घरी धुळ्याला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं होतं. तोरणांसाठी लागणारी, फुलं, सुई दोरा सगळं काही आधीच बॅगेत ठेवलं होतं. पहाटेच ५.३० ला मंगेश आणि मी धुळे-सुरत हायवेने मालेगावला निघालो. मालेगावच्या पश्चिम दिशेला सह्याद्री मधील गाळणा, पिसोळ, डेरमाळ, कंक्राळा असे अनेक दुर्लक्षित किल्ले आहेत. मालेगावच्या अलीकडेच १३ किलोमीटरवर कंक्राळा गाव आहे. बहुदा किल्ल्याच्या नावावरूनच गावाचं नावही कंक्राळा पडलं असावं. गावाच्या मागील बाजूने किल्ला दिसून येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच जावं लागतं. किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे. पायथ्यापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारपर्यंत जाण्यास ४५ मिनिटं लागतात. वाटेत बरीच दाट झाडंझुडुपं लागलीत. त्यामुळे नेमका रस्ता कळून येत नव्हता. थोडं वर चढल्यावर किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी दिसून आली. मग एका दमात आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वाराचंही बऱ्यापैकी नुकसान झालंय. तिथेही झाडं उगवलीत. यानंतर लगेचच आम्ही किल्ला फिरायला सुरुवात केली. किल्ल्यावर तसे काहीच अवशेष दिसून येत नाहीत. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेवाची पिंड, सोबत नंदी आणि हनुमानाची शेंदूर फासलेली मूर्ती दिसून येते. बहुतेक किल्ल्यावर शंकराचं मंदिर असावं. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. मनुष्यवस्ती आणि गर्दीपासून दूर असलेल्या या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. पुढे उजव्या बाजूला वर चढून गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलो. समोरच भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या दिसल्या. यातल्या दोन टाक्या आकाराने खूप मोठ्या आहेत. इथे जरा थांबून मग आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूस निघालो. इथे पडकी तटबंदी दिसून येते. उजव्या बाजूला किल्ल्याला वळसा मारला की खालच्या बाजूला प्रवेशद्वार दिसतं. समोरच्या बाजूने डोंगरात कोरलेल्या २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. गावकऱ्यांनी त्या टाक्यांच्या बाजूने खुणा करून ठेवल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या पाण्याची पातळी कधीच कमी होत नाही. तिथे बारमाही थंडगार पिण्याचं पाणी असतं. किल्ला उतरताना आम्ही त्या टाक्यांजवळ जायचं ठरवलं. खाली किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ आलो आणि तोरण बांधायला सुरुवात केली. तोरण बांधून झाल्यावर प्रवेशद्वारसमोरची काही झाडंझुडुपं मंगेशने तोडली आणि तोरण बांधायला जागा मोकळी झाली. यानंतर शिवनामाचा जयघोष केला. फोटो काढले. थोडा आराम करून किल्ला उतरायला सुरुवात केली. वाटेत त्या थंडगार पाण्याच्या टाक्यांना भेट दिली. थोडा वेळ तिथे विसावा घेऊन गडाला डोळ्यांत भरून घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. ही सहल कधीच विसरणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज