अशोक टाव्हरे एप्रिल २००९ या वर्षीचा तो दिवस होता. त्यावेळी मी कुटुंबासह गावी कनेरसर (ता. खेड) इथं राहात होतो. दुपारचे तीन वाजले होते. मी घरातून बाहेर अंगणात येण्यासाठी निघालो. अंगणात येऊन उभा राहिलो. माझी नजर सहज खाली गेली, तर माझ्या पायाजवळ अर्ध्याच फुटावर मोठा नाग फणा काढून होता. माझी बोबडी वळली. घाबरल्यानं माझ्या तोंडून शब्द निघत नव्हता. दुसऱ्या बाजूला पाय टाकावा म्हणून पाहिलं, तर दुसरीकडे तसाच दुसरा नाग होता. माझ्या पायांच्या दोन्ही बाजूला दोन नाग होते. दोन्ही एकसारखेच होते. नाग-नागिण, या संकल्पना डोक्यात येऊन गेल्या. कदाचित तो भीतीचा परिणाम असावा. डोकं भीतीनं सुन्न झालं होतं. पळताही येत नव्हतं. मी मोठ्यानं ओरडलो. थोडावेळ स्तब्ध उभं राहिल्यावर एक नाग अंगणातून पायरीवरून खाली गेला. दुसरा नागही घराबाहेर असलेल्या दगडी जात्याच्या फटीत शिरला. मी ओरडल्यावर पत्नी, वडील बाहेर आले. त्यांनीही नाग पहिले. साप स्वतःहून मनुष्याला इजा करत नाही हे अनेकदा वाचलं होतं. त्याचा प्रत्यय मला आला. अर्धा फूट अंतरावर दोन नाग, कल्पना करवत नाही. मोठा आणीबाणीचा प्रसंग होता. जसे काही दोन यमदूत माझ्या बाजूला उभे आहेत, असं तेव्हा वाटून गेलं. मला कोणत्याही प्रकारची इजा न करता ते दोन्ही नाग निघून गेले. मला आजही प्रश्न पडतो, ते दोन्ही नाग मी अंगणात उभं राहिल्यानंतर आले होते, की माझे पाय चालताना बरोबर दोघांच्यामधे पडले. दैव बलवत्तर म्हणून वाचलो. ही घटना आठवल्यावर आजही अंगावर काटा येतो. ...........
नागयोग..
माझ्या पायाजवळ अर्ध्याच फुटावर मोठा नाग फणा काढून होता. माझी बोबडी वळली.
Maharashtra Times 14 Apr 2016, 5:21 am