ऋतुजा गवस
मे महिन्याच्या शेवटी गावाहून (कोकणातून) मुंबईला परतीच्या प्रवासाला निघालो. बसचं वांद्रेहून बुकिंग होतं. मी, माझी दोन मुलं आणि माझी आई आम्ही मुंबईला येण्यासाठी बसची वाट पाहत होतो. बस ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरा आली. पण बस चांगली होती. मुलं खुश झाली. कणकवलीच्या आधी एका ठिकाणी जेवण केलं. रात्री ११ वाजता कणकवली बस स्थानकाच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर गाडी थांबली. बराच वेळ झाला. गाडी चालूच होईना. काय झालं बघायला एक दोन म्हणता-म्हणता जवळ-जवळ सगळेजण खाली उतरले.
झालं असं होतं की, जेवणानंतर गाडी प्रवास चालू झाला. पण मध्येच कसला तरी आवाज येतोय अशी शंका येऊन बसमधील एका महिलेनं बस थांबवली. ड्रायव्हरनं पाहणी केली. बसमधील इतर प्रवासीही खाली उतरले. पाहणीअंती लक्षात आलं की, टाकीच्या ठिकाणी काही तरी बिघाड झाला होता. तो दुरुस्त करणं गरजेचं होतं. नाही तर अनर्थ झाला असता. तसंच वेळ ही रात्रीची होती. कणकवली बसस्थानकाच्या अगदी बाहेरच गाडी उभी होती. एक-दोन दुकानं चालू होती. साध्या दोरीनं वर टाकी बांधून घेणं शक्यच नव्हतं. प्रवाशांनी फक्त बघ्याची भूमिका न निभावता बस चालकाला मदत केली.
मोठा दोरखंड उपलब्ध झाल्यावर एकत्र येऊन टाकी वर बांधली. एका प्रवाशाचे कपडे खराब झाले होते. तरीही प्रवास सुरक्षित होण्यासाठी केलेलं सहकार्य, समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. माझ्या आईच्या पायाला दुखापत झालेली होती. हे सगळं घडलं तेव्हा आम्हाला तिची काळजी वाटत होती. पण ती खाली उतरुन एका बाजूला उभी राहून सगळं पाहत होती. जवळजवळ सव्वा दोन तास सर्वांनी चालकाला मदत केली आणि अशा प्रकारे बस दुरुस्त झाली. पुढे घाटात किंवा जंगलात गाडी थांबली असती, काही झालं असतं तर सर्वच कठीण झालं असतं. पण प्रसंगावधान, सर्वांचं सहकार्य यामुळे मोठ्या संकटातून सर्वच वाचले. अखेर ती बस रात्री २ वाजता सुटली. या कसोटीच्या क्षणातून सुखरुप बाहेर पडलो. कठीण प्रसंगी एकमेकांना सहकार्य केल्यास संकटावर मात करून मार्ग सहजसोपा होतो, हे या अनुभवावरुन कळलं.