अ‍ॅपशहर

जगण्याची नवी उमेद मिळाली!

मुंबई पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखेत ३६ वर्षं सेवा करून निवृत्त झालो. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार होत असतात. जानेवारी १७ पासून ताप येणं, अशक्तपणा, असे शारीरिक त्रास होऊ लागले. काही डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक चाचण्या केल्या. तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा झाली. एप्रिलच्या दरम्यान मला थकवा जाणवू लागला. त्याचं एवढं मी मनावर घेतलं नाही. तसे चालणं, फिरणं, माझं चालूच होतं.

Maharashtra Times 21 Sep 2017, 12:24 am
दत्ताराम आंब्रे, टिळकनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम by inspiration
जगण्याची नवी उमेद मिळाली!


मुंबई पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखेत ३६ वर्षं सेवा करून निवृत्त झालो. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार होत असतात. जानेवारी १७ पासून ताप येणं, अशक्तपणा, असे शारीरिक त्रास होऊ लागले. काही डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक चाचण्या केल्या. तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा झाली. एप्रिलच्या दरम्यान मला थकवा जाणवू लागला. त्याचं एवढं मी मनावर घेतलं नाही. तसे चालणं, फिरणं, माझं चालूच होतं.
काही दिवस मी घरी आराम करत होतो. पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरच्या लक्षात आलं की, छातीत एका बाजूला पाणी झालंय. त्या ठिकाणी विविध टेस्ट करता-करता फुफ्फुसामध्ये कर्करोगाची लागण झालीय असं लक्षात आलं. नंतर मी माझ्या ओळखीच्या नातेवाईकातर्फे पुढील तपासणी करता दाखल झालो. त्या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची एक फाइल बनवली जाते आणि ती बनवत असताना एका तरुण महिला लिपिकेने माझं नाव विचारलं. त्यानंतर जन्म तारीख विचारली आणि मी ती सांगितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की, त्यादिवशीच माझा वाढदिवस आहे. तिने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा असाध्य कर्करोगामुळे मला माझ्या वाढदिवसाची आठवण पण नव्हती. फाइल बनवून झाल्यानंतर मला घरी येण्यासाठी संध्याकाळी सात वाजले.
दिवसभर माझ्याबरोबर माझा धाकटा मुलगा राकेश होता. घरी येऊन बघतो तर काय माझ्या बहिणी विजया, वासंती, उषा हजर होत्या. मी पण त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. माझा वाढदिवसानिमित्त त्या आल्या होत्या. यामध्ये माझी बहीण विजयाचा पुढाकार होता. तिने माझ्या भावजयीला कळवलं तसं माझी भावजय सारिका आंब्रे व सून शुभांगी आंब्रे तेवढ्यात त्यापण हजर झाल्या. या सर्वांनी मिळून मला शाल, पुष्पगुच्छ व बाळासाहेबांची तस्बीर देऊन माझा ६६वा वाढदिवस घरीच साजरा केला. असाध्य रोगामुळे मला कशाचंही भान नव्हतं. पण या सर्व घरातील मंडळींनी मिळून माझा वाढदिवस साजरा केला व मला जगण्याची नवी उमेद दिली. माझ्या शरीरात एक चैतन्य निर्माण झालं आणि कर्करोगाला सामोरं जाण्याचं धाडस झालं. एक जगण्याची दिशा मिळाली आहे. या सर्व मान्यवरांना धन्यवाद!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज