\Bअखेर पत्राचे उत्तर
नवी दिल्ली -\B महाराष्ट्र-म्हैसूर सीमाप्रश्नावर समाधानकारक तोडगा काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ पै यांना पाठवलेल्या पत्रात दिले आहे. पंतप्रधानांना सात ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रास उत्तर मिळाले नाही म्हणून पै यांनी २५ नोव्हेंबरला पुन्हा पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले होते की आपल्या उजळ कर्तृत्वाच्या वडिलांना दिवसाकाठी पाच हजार पत्रे येत, तरी त्याची उत्तरे ते तत्परतेने देत. सीमाप्रश्न सोडवणे फार निकडीचे आहे हे त्यांनी पहिल्या पत्रात प्रतिपादले होते. ताज्या पत्राला पंतप्रधानांनी काल उत्तर दिले.
\Bजमीन सुधारणा
नवी दिल्ली -\B राज्यसभेतील सदस्यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. ते जमीन सुधारणांबाबत कोरडी सहानुभूती दाखवत आहेत व भूमिहीनांच्या हितसंबंधाचे रक्षण ते करू शकले नाहीत, असा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला. या जमीन समस्येवर मुख्यमंत्र्यांनी आज येथे बैठक असतानाच आरोप करण्यात आला आहे.
\Bकाँग्रेसला पाठिंबा नाही
मुंबई -\B देशातील आजच्या बदलत्या परिस्थितीत जनसंघाचा पाठिंबा काँग्रेसमधील दोन गटापैकी एकाला निश्चितच मिळेल, असे समजून चालणारे लोक मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, असे उद्गार भारतीय जनसंघाचे कोषाध्यक्ष नानाजी देशमुख यांनी आज येथे काढले. ते म्हणाले, या संधिसाधू वातावरणात राष्ट्रद्रोही आणि फुटीर शक्तींना देशाच्या जीवनामध्ये आपले पाय रोवायला वाव मिळणार नाही, याबद्दल जनतेने खबरदारी घेतली पाहिजे.
\Bनामदेवांची सातशेवी जयंती
मुंबई -\B संस्कृत विद्यापीठ व इतर अनेक संस्थांतर्फे भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांची सातशेवी जयंती मुंबई विद्यापीठात साजरी करण्यात आली.
(२९ नोव्हेंबर, १९६९च्या अंकातून)