\Bगांधी यांचे प्रतिआव्हान
नवी दिल्ली - \Bशिस्तभंगावर इलाज करण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांचा ठाम आग्रह आहे. तर काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्यांवर हुकूमत गाजवण्याचा त्यांना अधिकार काय, असे प्रतिआव्हान इंदिरा गांधी यांनी दिले आहे. यामुळे काँग्रेसच्या दोन प्रतिस्पर्धी गटात दिलजमाई होण्याची शक्यता दिसत नाही. तरीही दोन्ही गटांत समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात यशवंतराव चव्हाण यांनी आज रात्री पुन्हा पंतप्रधानांची भेट घेतली. पण त्यांचा सल्ला न जुमानता शिस्तभंगाच्या बाबीवर भर दिला जात असल्यामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.
\Bबेदखल कुळांना जमिनी
मुंबई -\B विधानसभेत संमत झालेल्या विधेयकानुसार सव्वा लाख बेदखल कुळांना पुन्हा जमिनी मिळणार आहे. कूळ कायद्यातील पळवाटांचा व कुळाची गरिबी आणि अडाणीपणा याचा लाभ घेऊन या कुळांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या, त्या परत देण्याच्या दृष्टीने आवश्यक तो कायदेशीर आधार उत्पन्न करून देणारे विधेयक आज महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी मांडले. ते एकमताने संमत झाले.
\Bस्थानिकांना नोकऱ्या
मुंबई -\B ज्या नोकऱ्यांमध्ये खास प्रकारच्या तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही, अशा नोकऱ्यांसाठी शक्यतो स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे आणि याबाबतचे स्थानिक लोकांचे गाऱ्हाणे दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आज औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी व उद्योगपतींच्या सभेत केले. स्थानिक लोक म्हणजे कोण याचा खुलासा करताना मुख्यमंत्री म्हणाले, जे महाराष्ट्रात बरीच वर्षे स्थायिक आहेत व ज्यांनी महाराष्ट्र ही आपली भूमी मानली आहे, असे कोणतेही लोक स्थानिक लोकच होय. मग त्यांची भाषा किंवा धर्म किंवा जात कोणतीही असो.
(२० ऑगस्ट १९६९च्या अंकातून)