अ‍ॅपशहर

२३ जून १९६८

(२३ जून १९६८च्या अंकातून)...

Maharashtra Times 23 Jun 2018, 4:00 am

(२३ जून १९६८च्या अंकातून)

..

बहुमत शिरोधार्ह

श्रीनगर - लोकशाही बळकट करायची असेल तर बहुमताने घेतले जाणारे निर्णय शिरोधार्ह मानण्यास आपण शिकले पाहिजे, असे स्पष्ट उद्गार उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आज येथे काढले. गेले तीन दिवस चाललेल्या राष्ट्रीय एकात्मता मंडळाच्या समारोपाच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. देसाई म्हणाले, की लोकशाहीत नेहमीच मतैक्य होईल असे नाही, तर जेव्हा प्रचंड बहुमताने लोक एखादा निर्णय घेतात, तेव्हा इतरांनी त्याचे पावित्र्य मानले पाहिजे.

आसामला पुराचा तडाखा

शिलाँग - उत्तर आसाममधील निदान एक लाख लोकांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. या पुरात उत्तर लखीमपूर भागात एक मूल मरण पावल्याचे आणि दोघे बेपत्ता असल्याचे अधिकृत वृत्त आहे. सुमारे दहा हजार लोक बेघर झाले आहेत. पुरामुळे अडकून पडलेल्यांची सुटका करण्याचे काम लष्कराची हॅलिकॉप्टर्स व बोटी करत आहेत. पूरग्रस्ताचा निश्चित आकडा उपलब्ध नसला तरी लखीमपूर, दिब्रुगड, जोरहाट, दाराग जिल्हा या भागातून येणाऱ्या वृत्तावरून पाहता हा आकडा खूप मोठा असावा असे दिसते.

पुण्यात वाघिणी

पुणे - पंजाबहून महाराष्ट्रासाठी गहू आणि ज्वारी घेऊन आतापर्यंत जवळ जवळ ५६० वाघिणी आल्या असून गेले वीस दिवस त्यातील माल उतरविण्याचे काम चालू आहे. पुणे स्टेशनचा मालधक्का दिवसरात्र अन्नधान्य उतरविण्याच्या कामाने गजबजून गेला आहे. दर दिवशी सुमारे २७ वाघिणीतील माल उतरवला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय अधिकारी पी. के. दीक्षित यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या प्रतिनिधीस दिली.

आकाशवाणी कलाकार कायम

नवी दिल्ली - करारावर काम करीत असलेल्या आकाशवाणीवरील कलाकारांना त्यांच्या ५५ व्या वर्षापर्यंत नोकरीची नियुक्तिपत्रे देण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याने घेतला आहे. २५०० आकाशवाणी कलाकारांपैकी ९० टक्के कलाकारांना या निर्णयाचा लाभ मिळेल. पाच वर्षे व त्याहून कमी काळासाठी असलेल्या नोकरीच्या कराराऐवजी ही नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज