अ‍ॅपशहर

मटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला

मुंबई - सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रात 'नवयुग' निर्माण करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या पार्थिव देहावर आज दादर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार झाला व महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्रे युगाचा अस्त झाल्याची हुरहूर मनात घेऊन हजारो नागरिक महाराष्ट्राच्या खंद्या लढवय्या सेनापतीला अखेरचा मुजरा करून घरोघर परत फिरले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2019, 8:38 am
महाराष्ट्र हळहळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 50 years ago
मटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला


मुंबई - सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रात 'नवयुग' निर्माण करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या पार्थिव देहावर आज दादर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार झाला व महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्रे युगाचा अस्त झाल्याची हुरहूर मनात घेऊन हजारो नागरिक महाराष्ट्राच्या खंद्या लढवय्या सेनापतीला अखेरचा मुजरा करून घरोघर परत फिरले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही आचार्यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी सव्वादोन वाजता शिवशक्तीतून निघालेली आचार्य अत्रे यांची महायात्रा दादरच्या स्माशानभूमीवर आली, तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. स्मशानाभूमीवर हजारो लोक आधीच येऊन बसले होते. विविध राजकीय पक्ष व संघटनाच्या वतीने आचार्य अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कलावंत व रसिक यांच्या वतीने पु. ल. देशपांडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉक्टरांचा संप चालूच

मुंबई - मुंबईच्या चार सरकारी रुग्णालयातील २५० डॉक्टरांच्या (हाऊसमन, रजिस्ट्रार आणि इंटर्नीज) संपाचा आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. रफिक झकेरिया यांनी या डॉक्टरांनी ताबडतोब कामावर हजर व्हावे, असे आवाहन केले आहे. पगारवाढीचा प्रश्न सोडून त्या डॉक्टराच्या इतर सर्व मागण्या पुऱ्या करा असा हुकूम संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे डॉ. झकेरिया यांनी सांगितले. संपावरील डॉक्टरांच्या प्रवक्त्याने सांगितले की पगारवाढ आणि हॉस्पिटलातील इतर सुखसोयी या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.

नक्षलवादी नाहीत

ठाणे - आपली निष्क्रियता झाकली जावी आणि आपले मासिक तनखे कायम राहावेत म्हणून ठाण्याच्या आदिवासी भागात नक्षलवादी कम्युनिस्ट आल्याची हूल उठवून अधिक पोलिस बंदोबस्ताची मागणी त्या भागातील काँग्रेसचे पगारी प्रचारक करीत आहेत, अशा शब्दांत तलासरी भागात काम करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या काँ. गोदूताई परुळेकर यांनी सध्या मुंबईतील काही दैनिकांतून चाललेल्या प्रचाराची संभावना केली आहे. ठाण्याच्या आदिवासी भागात नक्षलवादी येऊन गेले, ही विधाने असत्य आहेत, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज