७ जुलै १९६८
मुंबईत ५० मजली इमारत
मुंबई - पन्नास मजली उत्तुंग इमारत, अनेक प्रेक्षागृहे, औद्योगिक संग्रहालय व कायम स्वरूपाचे विस्तीर्ण प्रदर्शन, प्रेक्षांगण ही बॅकबे रेक्लमेशनवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये असतील. कोट्यवधी रुपये खर्चून बॅकबे रेक्लमेशनवर सर विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रतिष्ठानची ही भव्य योजना अमलात आणण्यात येणार आहे. १९७५ पर्यंत ही योजना क्रमश: पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी समुद्र हटवून साडेसोळा एकर जमीन मिळविण्यात येणार आहे.
पाणबुडी विभाग सुरू
विशाखापट्टणम् - 'कलवारी' या पाणबुडीच्या आगमनाने आजपासून भारतीय नौदलात पाणबुडी विभाग सुरू झाला आहे. 'कलवारी'चे आज सकाळी सहाला नौदलतळावर आगमन झाले. याप्रसंगी नौदल नौका तलवार हिने 'कलवारी'च्या पाठराखिणीचे काम केले. रशियाकडून भारत ज्या काही पाणबुड्या खरेदी करणार आहे, त्यातील 'कलवारी' ही पहिली होय.
संस्थानिक सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली - तनखे रद्द करण्याच्या सरकारी निर्णयास आव्हान देण्यासाठी माजी संस्थानिक सर्वोच्च न्यायालयात जाणार हे जवळ जवळ निश्चित झाल्यासारखे आहे. याबाबत दिल्लीत हजर असलेल्या संस्थानिकांनी गेले दोन दिवस चर्चा होत आहे. तनखे रद्द करण्याचा निर्णय मान्य करावयाचा नाही आणि घटनादुरुस्ती करून कायदा केल्यास त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे जायचे, असे या संस्थानिकांनी ठरविल्याचे कळते.
विद्यापीठाचे काम सुरू
मुंबई - राहुरी येथे स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसर लवकरच आकार घेईल, अशी अपेक्षा आहे. राहुरी येथे विद्यापीठ स्थापण्याच्या कामाला गती मिळाली आहे. शेतीमंत्री पी. के. सावंत म्हणाले की १४०० एकर सरकारी जमीन विद्यापीठाला सहज मिळेल.
जीपीओ ११ मजली
मुंबई - एक कोटी ६० लाख रुपये खर्चून जी. पी. ओ. कंपाऊंडमध्ये नवीन ११ मजली इमारत बांधण्याची योजना आहे, असे महाराष्ट्र विभागाचे पोस्टमास्टर जनरल डॉ. एम. आर. कृष्णमूर्ती यांनी आज आमच्या प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले, "सॉर्टिंग विभागासाठी सांताक्रूझ येथे साडेएकोणीस लाखांची एक नवी इमारत बांधण्याची योजना आहे."