\Bपंढरपूरला भीमेचा वेढा
सोलापूर -\B पंढरपूरनजीक भीमेच्या पुराचे पाणी वाढून ते आज रात्री गोपाळपुरात शिरल्याचे वृत्त आहे. शहराच्या नदीकाठच्या सखल भागात पाणी येऊ लागताच नागरिकाच चिंतेचे वातावरण पसरले. पुराचे पाणी शहरात येण्यापूर्वीच महाद्वार व त्याच्या आसपास दुकाने आणि घरे रिकामी करण्याच्या तयारीला नागरिक लागले. दोन वर्षांपूर्वी भीमेला असाच पूर आला होता त्यावेळी निम्मे पंढरपूर पाण्यात बुडाले होते. पुराच्या संकटाची भीती लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. नागरिकांना आवश्यक त्या सूचना पालिकेतर्फे व पोलिसांतर्फे देण्यात येत आहेत.
\Bभडोचमध्ये पाणी
बडोदे\B \B-\B नर्मदेच्या वाढत्या पुराचे पाणी भडोच गावात आणि नदीकाठच्या तेरा खेड्यात शिरले आहे. आज सायंकाळी सहा वाजता पाण्याच्या पातळीने धोक्याचे रेषा ओलांडली आणि पाणी अद्याप वाढत आहे. पुराचे पाणी घुसलेल्या खेड्यांतील लोकांना इतरत्र हलवणे आगाऊ खबरदारी घेतल्याचे शक्य झाले. परंतु वित्तहानी मात्र झाली. भडोचमधील दांडिया बजार, चार रस्ता वगैरे सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. नदीकाठच्या २७ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
\Bसंपूर्ण महाराष्ट्र समिती
मुंबई\B \B-\B संपूर्ण महाराष्ट्र समितीची पुनर्रचना करून जनतेच्या प्रश्नासाठी लढणारी आघाडी असे तिचे स्वरूप बनवण्याबाबत विचारविनिमय उद्यापासून येथे सुरू होण्यास होणाऱ्या समितीच्या बैठकीत होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र समिती जोपर्यंत केवळ सीमालढ्याचे आदेश देत राहील तोपर्यंत समितीला लोकमत संघटित करण्यात येणे कठीण आहे, असा दृष्टिकोन संयुक्त समाजवादी पक्षाने घेतला असून त्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेने ज्वलंत प्रश्न घेऊन त्यासाठी संयुक्तपणे लढा देण्याचे काम समितीने अंगिकारावे असे आग्रहाने मांडले जाणार आहे.
\Bतारापूरची अणुवीज
मुंबई -\B विद्युतनिर्मिती करणारे पश्चिम महाराष्ट्रातील सारे जलाशय दुथडी भरून वाहू लागले असल्यामुळे औष्णिक व अणुविजेची निर्मिती थोड्याफार प्रमाणात कमी करावी लागत आहे, असा खुलासा महाराष्ट्र वीज मंडळाने केला आहे.
\B(३ ऑगस्ट १९६९च्या अंकातून)\B