मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. मार्च एंडिग आणि अप्रायझलची धामधूम सगळ्या ठिकाणी सुरू असते. वर्षभर ढोर मेहनत केली, तरी मूल्यमापन किंवा अप्रायझल मनाप्रमाणे होतेच असे नाही. काहींच्या अपेक्षा पूर्ण होतात, तर काहींचा नेहमीप्रमाणे अपेक्षाभंग होतो. स्पर्धेच्या काळात प्रत्येक जण दुसऱ्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी चांगल्यात चांगले करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. नोकरदारवर्गांमधील माणसे बढतीसाठी प्रयत्न करत असतात. कष्टाचे चीज झाले पाहिजे, असे सर्वांनाच वाटत असते. ज्योतिषशास्त्रात काही उपाय किंवा टिप्स सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वेतनवृद्धी आणि मनासारखे अप्रायझल मिळवण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया काही टिप्स...
हनुमंताला बुद्धिमतां वरिष्ठम् म्हटले जाते. चांगले अप्रायझल व्हावे, असा मानस असल्यास उडणाऱ्या हनुमानाच्या प्रतिमेची पूजा करावी. याशिवाय मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी हनुमान चालिसा पठण करावी.
बढती मिळण्यात काही अडचणी येत असल्यास दररोज उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे. हे अर्घ्य देताना तांब्याचा कलश वापरावा. आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह कमकुवत असल्यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो.
चांगली वेतनवृद्धी आणि मनोवांच्छित अप्रायझल मिळण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दीप अर्पण करावा. असे केल्यास नोकरीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय शनी मंत्राचा जप करावा.
व्यापार, व्यवसायात नेहमी नुकसान होत असल्यास कार्यालयात वृद्धी यंत्राची स्थापना करावी आणि दररोज ते पूजावे. यामुळे व्यापारात वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
अप्रायझल चांगले मिळण्यासाठी दररोज सात प्रकारची जसे जव, तीळ, मूग, धने, चणे, गहू अशी धान्ये पक्षांना खायला घालावीत. असे केल्यास बढती मिळण्यात येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. याशिवाय नव्या संधी मिळू शकतात, असे सांगितले जाते. मात्र, पक्षांना धान्य घालताना ते आपल्याच गच्चीवर किंवा छतावर घालू नये.
बढती मिळण्यास समस्या निर्माण होत असल्यास गुरुवारी गरजूंना पिवळ्या रंगांच्या वस्तू, फळ, कपडे यांचे दान करावे. असे केल्यास बढती आणि वेतनवृद्धी होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.
नोकरीत किंवा व्यापार-व्यवसायात नव्या संधी प्राप्त होण्यासाठी महादेव शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक करून अक्षता अर्पण कराव्यात. घराबाहेर शेंदूराने स्वस्तिक काढावे आणि त्याला फूल व अक्षता अर्पण कराव्यात. असे केल्यास अडचणी दूर होऊन बढती आणि नव्या संधी मिळण्याचा मार्ग सुकर होतो, असे सांगितले जाते.