प्रवीण तरडे यांनी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात या चित्रपटाचं अनेकदा नाव घेतलं जात आहे.
'धर्मवीर'मध्ये प्रसाद ओकने प्रमुख भूमिका साकारली असून इतरही अनेक कलाकारांनी दमदार भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचा सेट ठाण्यात उभारण्यात आला होता. या सिनेमातून आनंद दिघेंचा संपूर्ण प्रवास, इतिहास मांडण्यात आला आहे. १३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाईही केली आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने १२.८५ कोटी रुपये गल्ला जमवला होता.
धर्मवीर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे. झी ५ अॅपवर चित्रपट पाहता येऊ शकतो.
मंगेश देसाईंचा आज वाढदिवस असून वयाच्या पन्नाशीत ते पदार्पण करत आहेत. धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी या सिनेमात एका पत्रकाराची भूमिकाही साकारली आहे.
राजकीय चित्रपट नाही, तर सध्याच्या तरुण पिढीला आनंद दिघे यांच्यासारखं एक व्यक्तीमत्व होतं, ज्यांनी ४९ वर्षांच्या कालावधीत अनेकांना मदत केली, अनेकांच्या पाठीशी ते उभे राहिले, त्यांनी अनेक माणसं घडवली, त्यांचं हे माणूसपण, त्यांची ही माणूसकी समाजासमोर यावी याचं हेतूने हा सिनेमा केल्याचं मंगेश देसाई यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
हा राजकीय चित्रपट म्हणून केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्यात एक जिद्द होती, महत्त्वकांक्षा होती. एक ध्यास होता, जो आता हरवत चालला आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट कशी पूर्ण करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आनंद दिघे साहेबांचा सिनेमा आहे. म्हणून हा सिनेमा केला. केवळ प्रेक्षकांसाठीच हा सिनेमा केल्याचंही त्यांनी म्हटलं.
केवळ त्यांच्या जीवनातील वास्तव सिनेमात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात कोणतेही काल्पनिक सीन दाखवले नसल्याचंही ते म्हणाले.