आज जागतिक 'ऑटिझम डे' (स्वमग्नता दिवस). ऑटिझम म्हणजे नेमके काय, त्यातील औषधोपचारपद्धती कोणत्या, या मुलांना नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे. तसेटच ऑटिझम या मनोवस्थेविषयी समाजात विशेषत: पालकांमध्ये जनजागृती व्हायला हवी.
ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसकि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
संशोधकांनी ऑटिझम होण्याची काही कारणेही शोधून काढली आहेत. जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली व तणावाचे प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरू शकते. गरोदरपणाच्या काळात काही औषधांचे सेवन हेही ऑटिझमच्या कारणांपैकी एक कारण असू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सतत ताप येत असेल, अचानक फ्लूची लागण होत असेल तर किंवा कुठलेही अँटिबायोटिक्स घेण्यापूर्वी सल्ला घ्यावा, असे डॉक्टर सांगतात. वातावरणात असलेल्या टेराटोजेन्स आणि पाऱ्याच्या प्रमाणामुळेही अपत्याला जन्मजात ऑटिझमचा विकार असू शकतो.
ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक काम मानले जाते. या मुलांशी संवाद साधण्यात फार मोठी अडचण असल्याने त्यांच्यावर एकत्रितरीत्या उपचार करणेसुद्धा शक्य नसते. कशाप्रकारे उपचार पद्धती असावी या बाबतचे पालकांना योग्य समुपदेशन मिळणे गरजेचे ठरते. ऑटिस्टीक मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो, प्रत्येक मुलाची क्षमता, कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देणे आवश्यक ठरते. स्पीच थेरपी, फिजिओ थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स ड्रामा थेरपीचा वापर करावा लागतो. शैक्षणिक विकास पद्धती, कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरित्या सक्षम करण्यासाठी होऊ शकतो, अर्थात या सर्वासाठी पालकांचा आशावादी दृष्टिकोन, चिकाटी अत्यंत महत्वाची!
ऑटिस्टिक मुलांच्या प्रश्नांना सहानुभूतीची किनार असते. त्याऐवजी समाजाने पुढाकार घेऊन या मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला हवे. या पालकांचे जसे सपोर्ट ग्रूप्स आहेत तसाच आधार या मुलांनाही मिळायला हवा. मुलांमध्ये ऑटिस्टीकचे निदान झाल्यानंतर पालकांनी खचून न जाता , परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे.ऑटिस्टिक मुले फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या.ती स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे अशा मुलांशी संयमाने वागायला हवे. त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा.
गेल्या दशकात जगभरात ऑटिझमच्या प्रमाणात कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
-भारतात आज ऑटिझमचे प्रमाण ८८ मुलांमागे एक इतके दिसू लागले आहे.
-यातही मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा चारपट जास्त दिसत आहे.
-१२ ते १३ महिन्याच्या बालकांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून येतात.
- एकूण ऑटिस्टिक बालकांपैकी २०% बालकांमध्ये अनुवांशिकता हे कारण असल्याचे समोर आले आहे.