जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा ३३८वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे.
आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे ४.३० वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरुवात करण्यात आली.
स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी दाखल होत आहेत. टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी २ वाजता तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होणार असून वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेनुसार अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिरावर सुंदर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असणार आहे. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पालिकेने नियंत्रण कक्ष उभारला आहे. तसंच वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पालिकेकडूनही अनेक सुविधा करुन देण्यात आल्या आहेत.
आज १० जून रोजी देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार असून उद्या ११ जून रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. याआधी अनेक दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.