मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी पुण्यात मध्यरात्री रौद्रावतार धारण केलं. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने मोठी हानी झाली. रौद्र रूप धारण करत पावसानं आतापर्यंत एकूण ११ जणांचे बळी घेतले.
एका रात्रीत मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पावसाच्या थैमानात शेकडो गाड्यांचं नुकसान झालं आहे.
पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेल्या दुचाकींचा आणि तीन चाकी रिक्षांचा खच सर्वत्र पडला आहे. नागरिकांकडून या खचामध्ये आपल्या गाड्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर अरण्येश्वरसह इतर परिसरातही चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
पावसाने झोडपून काढल्यानं अनेक जनावरे वाहून गेली आहेत. वाहून गेलेल्या जनावरांची संख्या ४०हून अधिक असून त्यात २० शेळ्यांचा समावेश आहे.
काल रात्रभारात ठिकठिकाणी घरांची पडझड झाली . झाडे आणि भिंती कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या.
आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळं कात्रज, बिबवेवाडी , सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरलं .