देशभरात आज ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जाणून घेवूया राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली...
२००२ पूर्वी सामान्य नागरिकांना केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोनच दिवशी तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. परंतु, २००२ मध्ये ध्वज संहिता लागू झाल्यावर भारतीय नागरिक कधीही ध्वज फडकवू शकतात. अर्थात, योग्य ते नियम पाळून...
राष्ट्रध्वजाची लांबी व उंचीचं प्रमाण ३:२ असावं. तसंच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीनं फडकाविला गेला पाहिजे. मान्यवरांचं तोंड हे उपस्थितांकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.
राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीनं बांधला पाहिजे.
राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीनं बांधला पाहिजे.
कुठलाही पेहराव करताना ध्वजाचं कापड घेता येणार नाही. तसंच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.
राजकीय व्यक्ती, सैन्य दलाशी संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीनं फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.