भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची आज जयंती. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी...
समारे दीडशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नाशिकमधील त्र्यंबक येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात धुंडिराज यांचा जन्म झाला. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर १८८५ साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले.
कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या. गुजरातमधील गोध्रा येथे ते फोटोग्राफर म्हणून काही काळ कामही करत होते.
मुंबईत १५ एप्रिल १९१० रोजी ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित 'द लाईफ ऑफ ख्राइस्ट' हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांनी पाहिला आणि स्वदेशी चित्रपटांच्या कल्पनेचे बीज रोवले गेले. भारतात स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आणि या ध्येयाच्या वेडापायी त्यांनी पुढील अभ्यासासाठी थेट लंडन गाठले. रात्रंदिवस अविरतपणे झटून चित्रपटनिर्मितीची कलाही त्यांनी आत्मसात केली.
अखेर, ३ मे १९१३ रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट तयार केला आणि भारतात चलचित्रांचा आरंभ झाला. फाळकेंच्या 'राजा हरिश्चंद्र' चं बजेट त्या काळी १५ हजार रुपये होते असं म्हटलं जातं.
महिलांना चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दादासाहेब फाळके यांच्यामुळे मिळाली असंही म्हटलं जातं. त्यांच्या 'भस्मासूर मोहिनी' मध्ये दुर्गा आणि कमला या दोन महिलांनी काम केलं होतं.
दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीतील आपल्या १९ वर्षाच्या करिअरमध्ये सुमारे ९५ चित्रपट आणि २७ लघुपट बनवले. भारतीय संस्कृतीतील विविध पौराणिक कथा त्यांनी मोठ्या पडद्यावर मांडल्या.
'सेतु बंधन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १६ फेब्रुवारी १९४४ मध्ये नाशिकमध्ये त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या या जनकाला आदरांजली वाहण्यासाठी १९६९ मध्ये भारत सरकारने 'दादासाहेब फाळके पुरस्कारां'ची घोषणा केली.