हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचे आज निधन झाले. चेन्नईत त्यांनी वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्याचा आढावा...
एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन आहे. ते ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे काका एम. के. नारायणस्वामी यांनी घेतली. लहानपणीच ते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले. बंगालमधील भूकबळीच्या घटनांमुळं ते खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हाच त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं मनाशी ठरवलं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण केलं.
१९६० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना त्यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. त्यांनी डॉ. बोरलॉग यांना भारतात आंमत्रित केलं. त्यांच्यासोबत काम करता-करता स्वामीनाथन यांनी भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचं उत्पादन घेतलं. तसंच, कोणती खतं वापरून अधिक उत्पादन घेता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि गव्हाचं उत्पादन चार हंगामात १.२ कोटी टनावरून २.३ कोटी टन इतकं झालं.
स्वामीनाथन त्यांच्या प्रयत्नांमुळं देशातील कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली. १९६१-६६ दरम्यान अन्नधान्याचं उत्पादन ८.१ कोटी टन झालं. तर, १९९७-२००२ मध्ये २०.३ कोटी आणि २००३-०४ मध्ये ते २१.२ कोटी टनांवर गेलं.
गव्हाच्या प्रति हेक्टर उत्पादनात चारपट वाढ झाली होती.
हरित क्रांतीनंतर देशात यंत्रांचा वापर करून शेती करण्याचे प्रमाण वाढले. ट्रॅक्टर, हार्वेस्टर्स, थ्रेशर्स, डिझेल इंजिन, इलेक्ट्रॉनिक मोटर्स, पम्पिंग सेटच्या मागणीत वाढ झाली. त्याचबरोबर रासायनिक खतं, किटकनाशके यांची सुद्धा मागणी वाढली. यामुळं देशातील औद्योगिक उत्पादन वाढीलाही चालना मिळाली आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळाला होता. मात्र, आज २८ सप्टेंबर २०२३ रोजी हरित क्रांतीचे जनक एस. एस स्वामीनाथन यांचे निधन झाले.