नाशिक : आपल्या अवती-भवती अनेक प्रेमविवाह होत असतात. परंतू, दिव्यांगावर मात करत सिन्नर तालुक्यात दोन दिव्यांग प्रेमी युगलाचा नुकताच एक आगळा वेगळा विवाह सोहळा उजनी गावात संपन्न झाला. आयुष्यभर ऐकमेकांना साथ देण्याचे वचन घेऊन रेशमगाठ बांधणाऱ्या वधू - वरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिक्षणाच्या ओढीने सरपटत शाळेत जाणाऱ्या दोंघाची मैत्री होते. मग प्रेम आणि त्या कथेचा शेवट विवाहात झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
सिन्नर तालूक्यातील उजनी येथील जालिंदर आणि सारिका. जन्मत:च अपंग असले तरी दोघांना शिक्षणाची ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनी ठेवली आणि मग सुरू झाला शिक्षणाचा रोजचा प्रवास. दोन्ही घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे दररोज कुणी शाळेत सोडणे अशक्य. अशात वाहन व्यवस्था तर अशक्यप्राय होती. पण आपण म्हणतो ना जिथे इच्छा असेल तिथे हमखास मार्ग दिसतोच. तसेच इथे घडले.
दोघांनी दररोज चप्पल हातावर घेऊन सरपटत सरपटत का होईना शाळेत जाण्याचा पण केला आणि याचमुळे दोघांचे शिक्षण पूर्ण झाले. अपंग शाळेत शिकत असतांना ओळख-मैञी आणि प्रेम आणि नंतर त्याचा विवाह असा प्रवास झाला आहे.
या विवाह प्रसंगी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आदोंलनाचे अरुण पाचोरकरसह दिव्यांग बांधव नातेवाईक व मिञ परिवार हजर होते.