औरंगाबाद : उच्चशिक्षण घेऊन अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून दोन जिवलग मित्र गाव सोडून औरंगाबाद शहरात दुचाकीवरून निघाले होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न क्षणात भंगले.
लहानपणीच्या जिवलग मित्रांच्या अपघाताची वार्ता पोहोचताच संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली. आदित्य रामनाथ सुंब वय -२० (रा. मांजरी, ता. गंगापूर), यश (नयन)भाऊसाहेब शेंगुळे वय -२० वर्षे, (रा. जयसिंगनगर, गंगापूर) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोन्ही जिवलग मित्रांची नावे आहेत.
रस्त्यावर उभ्या यमरुपी ट्रकला त्यांची दुचाकी धडकली आणि या भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळाफाट्याजवळ घडली.
आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघेही (एम.एच. २० ई.एक्स ६०४८) या दुचाकीवरून औरंगाबाद येथे कॉलेजला जात होते. दरम्यान, भेंडाळा फाट्याजवळ नाशिक येथुन हैद्राबादला जाणारा ट्रक (के.ए. ५६ .४१२३) हा रस्त्यावर उभा होता. अचानक समोर ट्रक उभा पाहून दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी उभ्या ट्रकला धडकली.
आदित्य आणि यश हे दोघेही लहानपणीचे मित्र कुठेही जायचं तर सोबत, काहीही करायचं तर सोबत. अभ्यासदेखील सोबत करायचे. गांगापुरा अनेकजण दोघांना भाऊ समजायचे. दोघांनी उच्च शिक्षण घेण्याचे ठरविले आणि औरंगाबाद इथे भाड्याने खोली घेऊन राहू लागले. आज ते सामान घेऊन औरंगाबदमध्ये निघाले होते. मात्र, नियतीला काही औरच मंजूर होते. त्या खोलीत जाण्या अगोदरच दोघांचे आकस्मित निधन झाले.
अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चुराडा झाला. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेत चालक व नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. घटनेमुळे गंगापूर व मांजरी गावात शोककळा पसरली आहे.