या सामन्यातील सर्वात मोठी चुक म्हणजे विराट कोहलीने धावचीत होणे. कारण या गोष्टीमुळेच आजच्या दिवसाला कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्य रहाणेने चेंडू तटावला आणि तो २-३ पावले पुढे धावत आला. कोहलीने अजिंक्यकडे पाहिले आणि तो धावत सुटला. पण त्यानंतर अजिंक्यने कोहलीला रोखले आणि त्यामुळेच तो धावचीत झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला हा सर्वात मोठा धक्का होता. कारण कोहली या सामन्यात शतक झळकावेल, असे वाटत होते. पण त्याला ७४ धावांवरच समाधान मानावे लागले.
विराट कोहली धावचीत झाल्यावर संघाची जबाबदारी उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर होती. कोहलीबरोबर झालेली चुक अजिंक्य सुधारेल आणि मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण अजिंक्यला यावेळी ४२ धावांवरच समाधान मानावे लागले.
चेतेश्वर पुजारा हा एक असा खेळाडू आहे की, तो एकदा स्थिरस्थावर झाला तर तो मोठी खेळी साकारतो. पण या सामन्यात मात्र तसे पाहायला मिळाले नाही. कारण पुजाराने या सामन्यात १६० चेंडूंत ४३ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारीही रचली होती. पण पुजारा यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनच्या जाळ्यात अडकला.
पृथ्वी शॉ बाद झाल्यावर सलामीवीर मयांक अगरवालकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण अगरवालला यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश आले, त्याला १७ धावा करता आल्या आणि भारताला मोठा धक्का बसला.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही.