अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाने यावेळी कमाल केली. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभव पचवल्यानंतर रहाणेने चांगली संघ बांधणी केली. खेळाडूंना विश्वास दिला आणि त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली.
अजिंक्यने यावेळी संघात निर्णायक बदल केले आणि तेच भारतासाठी महत्वाचे ठरले. अजिंक्यने पृथ्वी शॉला बाहेर करत शुभमन गिलला संधी दिली आणि त्याने चांगली सलामी दिली. त्याचबरोबर रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आणि त्याची कामगिरी संघासाठी महत्वाची ठरली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी देत संघात चांगला बदल केला.
अजिंक्यने या सामन्यात दमदार शतक ठोकले. या दौऱ्यातील अजिंक्यचे शतक हे निर्णायक ठरले. कारण या दौऱ्यात कोणत्याही भारतीय खेळाडूला शतक करता आले नव्हते. अजिंक्यच्या शतकामुळे भारताच्या धावसंख्येत अमुलाग्र बदल झाला आणि त्यामुळेच भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली.
जडेजाची या सामन्यातील अष्टपैलू कामगिरी ही सर्वात निर्णायक ठरली. कारण जडेजाने महत्वाच्या विकेट्स संघाला मिळवून दिल्या. पण त्याचबरोबर त्याची पहिल्या डावात अजिंक्यबरोबर झालेली भागीदारी निर्णायक ठरली. पहिल्या डावात अर्धशतक झळकावत जडेजाने आपली सनिवड सार्थ ठरवली.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा केला आणि ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर ढकलले. जसप्रीत बुमरा आणि आर. अश्विन यांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी मोक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली आणि संघासाठी ते उपयुक्त ठरले.