भारतीय क्रिकेटपटू आता मोठी कमाई करतात, पण एक काळ असाही होता जेव्हा क्रिकेटर्सला अतिशय कमी मानधन मिळत होतं. २५ जून १९८३ मध्ये भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. त्याचवेळी संघातील प्रत्येकाला त्यांची सॅलरी म्हणून केवळ २१०० रुपये मिळाले होते.
कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २५ जून १९८३ ला वर्ल्डकप जिंकला होता. या ऐतिहासिक दिवसाने क्रिकेट इतिहासच बदलला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ४३ धावांनी हरवत हा इतिहास रचला गेला.
यावेळी टीम इंडियातील खेळाडूंना फी म्हणून १५०० रुपये आणि दिवसाला २०० रुपयाच्या हिशोबाने ६०० रुपये भत्ता असे एकूण मिळून २१०० रुपये मिळाले होते.
या विजयानंतर बीसीसीआयने लता मंगेशकर यांचा कॉन्सर्ट ठेवला होता. त्यानंतर संघाला २० लाखांचा फंड मिळाला. या फंडमधून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये दिले गेले होते.
मकरंद वायंगणकर यांनी ट्विटरवर त्यावेळी दिल्या गेलेल्या फीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये खेळाडूचं नाव आणि त्यांच्या नावासमोर दिलेले पैसे आणि सही दिसते आहे.
खेळाडूंना मिळालेल्या मानधनचा फोटो शेअर करत त्यांनी या प्रत्येकाला १० कोटी रुपये मिळायला हवे होते, अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्डकप जिंकून ३९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या फोटोवरुन ३९ वर्षांपूर्वी क्रिकेटर्सला दिलं जाणारं मानधन आणि आताच्या क्रिकेटर्सला दिलं जाणारं मानधन यांच्यातील तफावत नक्कीच समजू शकते.