वृत्तसंस्था, मनिला (फिलिपिन्स)
श्रीकांत, प्रणॉय अशा एकेरीतील तज्ज्ञ बॅडमिंटनपटूंच्या पराभवानंतर युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि दुहेरीतील जोड्यांनी मोक्याच्या क्षणी लढती जिंकल्यामुळे भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत पदक निश्चित केले आहे. शुक्रवारी पार पडलेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने थायलंडवर ३-२ असा विजय मिळवला.
०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतासाठी लक्ष्यने एकेरीची लढत जिंकली. तर एमआर अर्जुन/ध्रुव कपिला तसेच चिराग शेट्टी आणि त्याच्यासह दुहेरीत खेळणाऱ्या श्रीकांतने दुहेरीच्या लढती जिंकून भारताला आशियाई स्पर्धेतील दुसरे पदक निश्चित करून दिले. याआधी २०१६मध्ये हैदराबाद येथे पार पडलेल्या या सांघिक स्पर्धेत भारताने ब्राँझपदकाची कमाई केली होती. मुख्य म्हणजे भारताचा दुहेरीतील तज्ज्ञ बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डीने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे चिरागसह एकेरीतील एखादा खेळाडू कामचलाऊ दुहेरीचा खेळाडू म्हणून लढतीत भाग घेतो. तशा प्रतिकुलतेतही भारताने थायलंडला नमवले ही नक्कीच कौतुकाची बाब आहे.
\Bसामन्याचा निकाल\B
भारत ३ थायलंड २
साईप्रणीत पराभूत वि. कांताफोन १४-२१, २१-१४, १२-२१. श्रीकांत पराभूत वि. कुनलावूत २०-२२, १४-२१. अर्जुन-ध्रूव कपिला विजयी वि. केदरन-तनूपत २१-१८, २२-२०. लक्ष्य सेन विजयी वि. सुपन्यू २१-१९, २१-१८. श्रीकांत-चिराग विजयी वि. मनीपाँग-निपितफोन २१-१५, १६-२१, २१-१५.
सात्त्विकच्या (रंकीरेड्डी) अनुपस्थितीत आम्ही दुहेरीत मिळालेला विजय उल्लेखनीय आहे. आम्ही विजयासाठी एकेरीच्या निकालांवर अवलंबून होतो. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवांनंतर उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे होते. अर्जुन आणि ध्रूव यांनी दुहेरीत व लक्ष्यने एकेरीत मिळवलेल्या विजयामुळे हा विजय म्हणजे सांघिक कामगिरी ठरली.
- चिराग शेट्टी, भारताचा बॅडमिंटनपटू