थायलंड ओपन
वृत्तसंस्था, बँकॉक
एकेरीतील भारतीय बॅडमिंटनपटू अखेरपर्यंत लढत असताना, दुहेरीतील खेळाडू मात्र दुसऱ्या-तिसऱ्या फेरीतच पराभूत होतात, असे चित्र आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळते. मात्र, थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सध्या या उलट चित्र बघायला मिळते आहे. भारताच्या एकेरीतील खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असताना सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्त्विक-चिराग जोडीने कोरियाच्या को सुंग ह्यून -शिन बाएक चेओल जोडीवर २२-२०, २२-२४, २१-९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ही लढत एक तास अन् तीन मिनिटे चालली. शिन-को जोडी जागतिक क्रमवारीत १९व्या, तर सात्त्विक-चिराग १६व्या क्रमांकावर आहे. पहिल्या गेममध्ये शिन-को जोडीने सुरुवातीला दोन पाउल पुढे राहून ९-६ अशी आघाडी मिळवली. ब्रेकला शिन-को जोडीकडे ११-१० अशी एका गुणाची आघाडी होती. ब्रेकनंतर सात्त्विक-चिराग जोडीने चिवट लढा दिला. या जोडीने प्रतिस्पर्धीला १३-१३ असे बरोबरीत गाठले. यानंतर या गेममध्ये चढ-उतार बघायला मिळाले. सात्त्विक-चिराग जोडीने २०-१८ अशी आघाडी मिळवली होती. को-शिन जोडीने दोन गेम पॉइंट वाचविले. यानंतर पुढील दोन गुण घेत सात्त्विक-चिराग जोडीने पहिली गेम जिंकली.
दुसऱ्या गेममध्ये को-शिन जोडीने जबरदस्त पुनरागमन केले. या जोडीने ९-९ अशा बरोबरीनंतर १८-१२ अशी आघाडी मिळवली होती. सात्त्विक-चिराग जोडीही सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. त्यांनी आक्रमक खेळ करून को-शिन जोडीला २०-२० असे बरोबरीत गाठले. त्याचबरोबर पुढील गुण घेत 'मॅच पॉइंट'ही मिळवला होता. मात्र, को-शिन जोडीला हा 'मॅच पॉइंट' वाचविण्यात यश आले. यानंतर सात्त्विक-चिराग जोडीने पुन्हा 'मॅच पॉइंट' मिळवला. को-शिन जोडीने सलग तीन गुण घेत गेम जिंकली आणि आपले आव्हान राखले. निर्णायक गेममध्ये मात्र सात्त्विक-चिरागच्या आक्रमक खेळासमोर कोरियाच्या जोडीचा निभावच लागला नाही.
दृष्टिक्षेप...
- बीडब्लूएफ सुपर ५०० स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सात्त्विक-चिराग ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.
- विजेतेपदासाठी रविवारी भारतीय जोडीची तिसऱ्या मानांकित चीनच्या लि जून हुई-लियू यु चेन जोडीशी लढत होईल.
- यंदाच्या मोसमात सात्त्विक-चिरागने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
- या जोडीने गेल्या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळवले आहे.
..........
आम्ही दोघांनीही अखेरपर्यंत संयम गमावला नाही आणि हेच आमच्या यशाचे गमक आहे. दुसऱ्या गेममध्ये आम्ही दोन मॅच पॉइंट गमावले. पण, निर्णायक गेममध्ये विजय मिळवण्यात आम्हाला यश आले. गुणांसाठी आम्ही कुठलीही घाईगडबड केली नाही. जेव्हा-जेव्हा आम्हाला संधी मिळाली, त्या संधीचे आम्ही सोने केले. म्हणूनच आमच्याकडून फारशा चुका झाल्या नाहीत.
- चिराग शेट्टी.