वृत्तसंस्था, नानिंग भारताला सुदीरमन कप मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी सलामीच मलेशियाकडून २-३ असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यामुळे 'ग्रुप १ डी'मधून बादफेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला आहे. पुरुष एकेरीच्या लढतीत श्रीकांतला न खेळवता समीर वर्माला संधी देण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आला असे म्हणावे लागेल. भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीने जबरदस्त कामगिरी करून एक तास, दहा मिनिटे रंगलेल्या मिश्र दुहेरीच्या लढतीत मलेशियाच्या गोह सून हुआत-लाई शेव्हॉन जेमी जोडीचे आव्हान १६-२१, २१-१७, २४-२२ असे परतवून लावले. भारताने १-० अशी आघाडी घेत आत्मविश्वासाने सुरुवात केली. मात्र यानंतर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतऐवजी जागतिक रँकिंगमधील तेराव्या स्थानावर असणाऱ्या समीर वर्माला उतरविण्याचा निर्णय भारताने घेतला. ली झी जियाने अवघ्या ४८ मिनिटांत समीर वर्माचे आव्हान २१-१३, २१-१५ असे परतवून लावले आणि मलेशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. पीव्ही सिंधूने गोह हिला २१-१२, २१-८ असे सहज पराभूत करून भारताला पुन्हा २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, अॅरॉन चिया आणि टेओ जोडीने भारताच्या मनू अत्री-सुमीत रेड्डीला २२-२०, २१-१९ असे नमवून मलेशियाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. अश्विन पोनप्पा दुहेरीच्या लढतीसाठी सिक्की रेड्डीसह खेळली; पण या दोघींना कुआन- यीन या जोडीकडून ११-२१, १९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. बलाढ्य चीनचे आव्हान आठव्या सीडेड भारताची आता बुधवारी लढत होईल ती बलाढ्य चीनविरुद्ध.
श्रीकांतची विश्रांती अंगलट
वृत्तसंस्था, नानिंग भारताला सुदीरमन कप मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी सलामीच मलेशियाकडून २-३ असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला...
MT 23 May 2019, 4:00 am