गुजरात संघाचा
महाराष्ट्रावर डावाने विजय
- रणजी करंडक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
यंदाच्या मोसमात महाराष्ट्र संघाच्या अपयशाचा सिलसिला कायम राहिला असून, गुजरातविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट लढतीत महाराष्ट्राला १ डाव आणि १३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या मोसमात महाराष्ट्राला कर्नाटककडून ७ विकेटनी, सौराष्ट्राकडून ५ विकेटनी हार पत्करावी लागली होती. तसेच, विदर्भ, बडोदा, मुंबई, छत्तीसगड या संघाविरुद्धच्या लढती अनिर्णित राहिल्या होत्या.
गहुंज्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये ही चारदिवसीय लढत झाली. तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राची ६ बाद १३७ अशी अवस्था झाली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी महाराष्ट्राला आणखी १७८ धावांची आवश्यकता होती. बुधवारी सकाळी नऊ षटकांतच महाराष्ट्राचा डाव १८५ धावांवर आटोपला. अनुपम संकलेचाने झुंज देत ३२ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४० धावांची खेळी केली. गुजरातकडून चिंतन गाजाने ४७ धावांत ३, तर पियूष चावलाने १८ धावांत ३ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव - सर्वबाद २३० आणिु दुसरा डाव - ५५.५ षटकांत सर्वबाद १८५ (अनुपम संकलेचा नाबाद ४०, नौशाद शेख ४०, आशय पालकर ३४, निकित धुमाळ १६, पियूष चावला ८.५-३-१८-३, चिंतन गाजा १४-५-४७-३, रूष कलारिया १७-४-५८-२, अरझान नागवासवाला ८-१-२७-१) पराभूत वि. गुजरात : पहिला डाव - १३० षटकांत ८ बाद ५४५ घोषित.
-४१ वर्षांनी...
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये गुजरातने यापूर्वी नोव्हेंबर १९७७मध्ये महाराष्ट्रावर एक डाव आणि १३८ धावांनी विजय नोंदविला होता. वलसाडला ही लढत झाली होती. आता पुन्हा एकदा 'रणजी'त महाराष्ट्राला गुजरातविरुद्ध डावाने पराभवाला सामोरे जावे लागले.
- अनुपमचे 'द्विशतक'
महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचा याने 'रणजी'मध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. गुजरातविरुद्धच्या लढतीत चिंतन गाजा, मनप्रीत जुनेजा आणि रूजुल भट यांना बाद करत अनुपमने बळींचे द्विशतक साजरे केले. प्रथम श्रेणीतील ५६ सामन्यांत २५.५२च्या सरासरीने अनुपमने २०० बळी घेतले आहेत.
----------