अ‍ॅपशहर

भारताला नमवून बांगलादेश अजिंक्य

क्वालांलपूरः बांगलादेशच्या महिलांनी तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करून पुन्हा एकदा भारतावर वर्चस्व राखले...

Maharashtra Times 11 Jun 2018, 2:52 am

क्वालांलपूरः बांगलादेशच्या महिलांनी तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करून पुन्हा एकदा भारतावर वर्चस्व राखले. अंतिम लढतीत बांगलादेशने सहा वेळा विजेता राहिलेल्या भारतीय महिला संघावर तीन विकेटनी मात करून आशिया कप टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे भारताला या स्पर्धेत दोन वेळा बांगलादेशकडून पराभूत होण्याची नामुष्की सहन करावी लागली. बांगलादेशचे या स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम bangladesh beat india in womens asia cup final
भारताला नमवून बांगलादेश अजिंक्य


डावाच्या चौथ्याच षटकात स्मृती (७ ) धावबाद झाली. यानंतर दीप्ती शर्माही चार धावांवर माघारी परतली. मिताली राजलाही (११) फटकेबाजी करण्यात अपयश आले. पहिल्या दहा षटकांतच भारताच्या चार फलंदाज माघारी परतल्या होत्या. यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे हाती घेतली. मात्र, दुसऱ्या बाजूने तिला चांगली साथ मिळाली नाही. हरमनप्रीत कौरने ४२ चेंडूंत ७ चौकारांसह ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला किमान ९ बाद ११२ धावांपर्यंत तरी पोहोचता आले. मात्र, बांगलादेशच्या महिलांना रोखण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. बांगलादेशने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत विजय मिळवला. पूनम यादवने अचूक मारा करून बांगलादेशच्या आघाडीच्या चार फलंदाजांना अवघ्या ९ धावा देत बाद केले होते. तिला हरमनप्रीत कौरचीही साथ मिळाली होती. मात्र, झूलन गोस्वामीच्या दोन षटकांत २० धावा भारताला चांगल्याच महागात पडल्या. बांगलादेशकडून निगर सुल्ताना आणि रुमाना अहमद यांनी अनुक्रमे २७ आणि २३ धावा करून विजयात मोलाची भूमिका निभावली.

स्कोअरबोर्ड : भारत २० षटकांत ९ बाद ११२ (हरमनप्रीत कौर ५६, मिताली राज ११, वेदा कृष्णमूर्ती ११, रुमाना अहमद २-२२, खांदिजा तूल कुब्रा २-२३) पराभूत वि. बांगलादेश - २० षटकांत ७ बाद ११३ (निगर सुलताना २७, रुमाना अहमद २३, पूनम यादव ४-९, हरमनप्री कौर २-१९).

दृष्टिक्षेप...

- मर्यादित षटकांच्या सामन्यांत मिताली राज आणि झूलन गोस्वामीच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे.

- मागील चार लढतींत मितालीला ११, ०, २३ आणि १५ धावाच करता आल्या आहेत.

- आशिया कपमध्ये बांगलादेशने दोन वेळा भारताला पराभूत केले.

- अंतिम फेरीत बांगलादेशचा निम्मा संघ ६५ धावांत माघारी परतला होता.

...

या लढतीचा दबाव अधिक होता. आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी केली. मात्र, आमच्या फलंदाजांना स्वत:वर नियंत्रण राखता आले नाही. त्याचा फटका बसला. अर्थात, विजयाचे श्रेय बांगलादेशला द्यायलाच हवे. त्यांनी सर्व आघाड्यांवर आमच्यावर वर्चस्व राखले. फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा केला. धावसंख्या फार नव्हती; पण आम्ही शेवटपर्यंत लढलो.

- हरमनप्रीत कौर, भारताची कॅप्टन

...

अंजू जैनचा वाटा

बांगलादेशच्या महिला संघाला भारताची माजी सलामीची खेळाडू अंजू जैन मार्गदर्शन करीत आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशने दोन वेळा या स्पर्धेत भारताला पराभूत केले. अंजू भारताच्या मिताली राज आणि झूलन गोस्वामीसह खेळली आहे. त्यामुळे तिला भारताच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची कल्पना आहे. त्यामुळे बांगलादेशच्या विजयात तिच्या नियोजनाचाही मोठा वाटा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज