वर्ल्ड कपसाठी पाकला रोखणे बीसीसीआयला अशक्य
वृत्तसंस्था, नवी दिल्लीप्रशासकीय समिती (सीओए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बंदी घालावी, असे ...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रशासकीय समिती (सीओए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बंदी घालावी, असे कुठलेही पत्रक तयार केलेले नाही. आणि जरी असे पत्रक तयार केले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) हा प्रस्ताव फेटाळून लावेल, असा खुलासा एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले. यावरून भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपसाठीही पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला. अशा स्थितीत इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपदरम्यानच्या १६ जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट लढतीवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुबई येथे २७ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान आयसीसीची बैठक होणार आहे. आणि त्यात हा मुद्दा चर्चिला जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की असे कुठलेही संविधान नाही किंवा करार नाही, की ज्यामुळे पाकिस्तानला वर्ल्ड कपसाठी रोखता येईल. एकदा का आयसीसीचा दर्जा मिळाला, तर आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा अधिकार या संघांना आहे.
या चर्चेदरम्यानच, प्रशासकीय समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक होणार आहे. अध्यक्ष विनोद राय आणि माजी कॅप्टन डायना एडुलजी या बैठकीला उपस्थित राहणार असून, ते उत्तराखंडला प्रतिनिधित्व देण्याबाबत या बैठकीत चर्चा करणार आहेत. अर्थात, या बैठकीत भारत-पाकिस्तान सामन्याच्या चर्चेचे सावट नक्कीच असणार आहे. एडुलजी म्हणाल्या, 'बैठकीत आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. देशासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.'
बीसीसीआयला पाठिंबा मिळणे अवघड
बीसीसीआयने पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून हटविण्याची मागणी केली आणि आयसीसीने त्यास मान्यता दिली, तर हा मुद्दा एप्रिलमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मांडावा लागेल. त्यानंतर हा मुद्दा सदस्य बोर्डसमोर ठेवला जाईल. या संदर्भात मत घेतले जाईल. आयसीसी बोर्डात सध्यातरी बीसीसीआयला बहुमत नाही. अशा वेळी भारताला पाठिंबा मिळणे अवघड असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. याचबरोबर २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३च्या वर्ल्ड कप आयोजनाच्या भारताच्या आशांनाही धक्का बसू शकतो.