नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समिती आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील बाद फेरीच्या सामन्यांची वेळ रात्री ८ ऐवजी संध्याकाळी ७ करण्याच्या निर्णयास खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विरोध दर्शविला आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख राजीव शुक्ला यानी हे सामने ७ वाजता सुरू व्हावेत असा निर्णय घेतला होता. प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हा निर्णय शुक्ला यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात आलेला आहे असे स्पष्ट केले. त्यावर चौधरी म्हणतात की, हा सोयीस्कर निर्णय आहे आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या इतर सदस्यांनाही त्यासाठी विश्वासात घ्यावेसे वाटले नाही का? राय यांच्या मते बक्षीस वितरणाला बराच वेळ लागत असल्यामुळे सायंकाळी ७ची वेळ योग्य आहे. पण चौधरी यांना हे पटत नाही. चौधरी म्हणतात की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच असे निर्णय घेतले जायला हवेत. अचानक असे निर्णय घेणे योग्य नव्हे. बाद फेरीचे सामने जवळ आलेले असताना शेवटच्या क्षणी आपण असा निर्णय घेऊ शकत नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली त्यात सामन्यांच्या वेळेसंदर्भात चर्चाही झाली पण त्यावेळी कुठेही हा विषय निघाला नाही.
IPL सामन्यांच्या वेळेवरून संघर्ष
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समिती आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे...
Maharashtra Times 13 May 2018, 4:00 am