अ‍ॅपशहर

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत, संघ पाठवण्यापूर्वी बीसीसीआयला ही अट पूर्ण करावी लागणार...

भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. १७ डिसेंबरपासून दोन्ही संघांमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पण भारताचा हा दौरा आता अडचणीत सापडला असल्याचे पाहायला मिळत आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 27 Nov 2021, 7:35 pm
नवी दिल्ली : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोरोनाचे सावट असल्याने हा दौरा होणार की नाही, याचीच चर्चा सगळीकडे होत आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे दक्षिण आफ्रिकेतील संकट अधिक गडद होऊ लागले आहे. अनेक युरोपीय देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारत सरकारने अजूनही उड्डाणांबाबत कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही, पण केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठे विधान केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेला संघ पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारचा सल्ला घ्यावा, असा स्पष्ट संदेश ठाकूर यांनी दिला आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci should consult govt before sending cricket team to south africa
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत, संघ पाठवण्यापूर्वी बीसीसीआयला ही अट पूर्ण करावी लागणार...


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची चौथी लाट आली आहे. यावेळी कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याची दखल घेतली आहे. या नव्या विषाणूला 'ओमिक्रॉन' असे नाव दिले असून त्याचे मोठा धोका असे वर्णन केले आहे. याच कारणामुळे दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही प्रकारची क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता मावळली आहे.

भारतीय संघ ८-९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. बीसीसीआयने आफ्रिका दौऱ्याबाबत अजूनही कोणता निर्णय घेतलेला नाही, पण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ठाकूर म्हणाले की, “फक्त बीसीसीआयच नाही, तर प्रत्येक क्रीडा संघटना आणि मंडळांनी त्यांचा संघ नवीन कोरोना संसर्ग असलेल्या देशांमध्ये पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारचा सल्ला घ्यावा. अशा देशांत संघ पाठवणे धोक्याचे ठरू शकते. बीसीसीआयने या प्रकरणी आमचा सल्ला घेतल्यास आम्ही विचार करू.”

दरम्यान, भारताचा एक संघ याआधीच दक्षिण आफ्रिकेत दाखल आहे. भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध ४ दिवसीय अनधिकृत कसोटी सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफॉन्टेन येथे आहे. बीसीसीआयने भारतीय अ संघाला मायदेशी बोलावण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. वरिष्ठ भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवण्यापूर्वी बीसीसीआय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी चर्चा करत असून अधिक माहिती मिळवत आहे.

महत्वाचे लेख