अ‍ॅपशहर

भारताची ताकदच ठरली कमजोरी, ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपूर्वी रोहित आणि द्रविड यांची चिंता वाढली

IND vs AUS : कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच रोहित शर्मा व राहुल द्रविड यांची चिंता वाढलेली आहे. कारण भारतीय संघ त्यांच्याच चक्रव्ह्यूहात अडकू शकतो.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 4 Feb 2023, 8:15 pm
नागपूर : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची चिंता वाढलेली आहे. कारण आतापर्यंत भारताची जी मुख्य ताकद समजली जात होती, तीच आता कमजोरी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रोहित आणि द्रविड यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम INDIA vs AUSTRALIA
सौजन्य-बीसीसीआय


भारतासाठी ही मालिका सर्वात महत्वाची आहे. कारण या मालिकेत जर भारताने विजय साकारला तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळता येऊ शकते. पण त्यासाठी भारताला ३-० किंवा ३-१ अशा फरकाने विजय मिळवावा लागेल. पण या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघात चिंतेच वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. कारण जी गोष्ट भारताची ताकद होती तीच आता त्यांच्यासाठी कच्चा दुवा ठरू शकते. त्यामुळे आता नेमकं करायचं तरी काय, हा प्रश्न रोहित आणि द्रविड यांना पडला होता.

कसोटी मालिकेपूर्वी एक मोठी गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने भारतामध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी खास रणनिती आखली आहे. भारताच्या काही स्थानिक फिरकीपटूंना त्यांनी हाताशी धरले आहे आणि त्यांच्याकडून तडा गेलेल्या खेळपट्टीवर ते गोलंदाजी करून घेत आहेत. दुसरीकडे गेल्या काही सामन्यांमध्ये भारताचे फलंदाज फिरकी गोलंदाजीवर लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आपण जर फिरकीला पोषक असलेली खेळपट्टी बनवली तर आपल्याच चक्रव्ह्यूहात अडकू शकतो, ही भिती आता भारतीय संघाला वाटत आहे. त्यामुळे आता खेळपट्टी बनवण्याबाबत रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि भारतीय संघ व्यवस्थापनातील काही व्यक्तींनी काही सुचना केल्याचे समोर आले आहे. या मालिकेसाठी फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्ट्या बनवू नये, असे रोहित आणि द्रविड यांनी बीसीसीआयला सांगितल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या कसोटी मालिकेत क्रिकेटच्या भाषेत भिंगरी खेळपट्टी बनवण्यात येणार नाही. त्यामुळे फिरकीच्या आखाड्यात परदेशी संघाला चीतपट करण्याचे स्वप्न आता भारतीय संघ बघत नसल्याचे समोर येत आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख