अ‍ॅपशहर

विराट कोहलीमुळे झाला रोहित आणि द्रविड यांच्यामध्ये वाद, पाहा कोण जिंकलं अन् कोण हरलं...

Virat Kohli : विराट कोहली हा चौथ्या दिवसाचा हिरो ठरला. कोहलीने १८६ धावा करत भारताची धावगती वाढवली आणि संघाला धावांचा डोंगर उभारून दिला. पण कोहली खेळत होता तेव्हा मात्र रोहित शर्मा व राहुल द्रविड यांच्यामध्ये वाद सुरु होता. हा वाद नेमका का सुरु झाला होता आणि या वादात अखेर कोण जिंकलं, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 12 Mar 2023, 7:54 pm
अहमदाबाद : कसोटीचा चौथा दिवस गाजवला तो विराट कोहलीने. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताला दमदार आघाडी मिळवता आली. पण विराट कोहलीमुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामध्ये वाद झाल्याचे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Virat Kohli, Rohit Sharma And Rahul Dravid


कोहलीने आजचा दिवस गाजवला. जवळपास तीन वर्षांनी कोहलीला आज कसोटीत शतक झळकावता आले. कोहलीने या २४ व्या कसोटी शतकासह बरेच विक्रम मोडले. शतकानंतरही कोहली थांबला नाही. कोहलीने दमदार फटकेबाजी केली आणि त्याने १५० धावांचाही टप्पा गाठला. कोहली धावांचा रतीब घालत असताना भारताची धावगीतही वाढत होती. त्यामुळेच सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताला ९१ धावांची आघाडी घेता आली. पण एकिकडे कोहली दमदार फटकेबाजी करत असताना रोहित आणि द्रविड यांच्यामध्ये मात्र वाद सुरु असल्याचे आता समोर आले आहे.

कोहलीने शतक झळकावले तोपर्यंत सर्व आलबेल होते. पण कोहलीने १५० धावा पूर्ण केल्या तेव्हा मात्र रोहित आणि द्रविड यांच्यामध्ये वाद सुरु झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीने १५० धावा केल्यावर रोहित शर्माला संघाचा डाव घोषित करायचा होता आणि ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण करायचे होते. पण द्रविड यांनी मात्र या गोष्टीला नकार दिला. यावेळी द्रविड यांना कोहलीचे द्विशतक व्हावे असे वाटत होते. त्यामुळे रोहित आणि द्रविड यांच्यामध्ये काही काळ खलबतं सुरु होती. त्यानंतर रोहित शर्माने द्रविड यांच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि कोहलीच्या १५० धावा झाल्या तेव्हा डाव घोषित करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे कोहलीच्या द्विशतकाचा मार्ग द्रविड यांनी मोकळा केला होता.

पण या गोष्टीचा फायदा मात्र कोहलीला उचलता आला नाही. कारण कोहली यावेळी १८६ धावांवर बाद झाला आणि त्याचे द्विशतक हुकले. भारताचा डाव घोषित करण्याच्या वादात द्रविड जिंकले खरे, पण कोहलीच्या २०० धावा झाल्या नाहीत आणि त्यांच्या या विजयाचे सोने मात्र होऊ शकले नाही.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख