अ‍ॅपशहर

हार्दिक पंड्यामुळे मिळाला ऑस्ट्रेलियाला विजय, सामनावीर कॅमेरून ग्रीनचा मोठा खुलासा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या विजयात कॅमेरून ग्रीनचा मोठा वाटा होता. ग्रीनलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ग्रीनने यावेळी एक मोठा खुसाला केला आहे. हार्दिक पंड्यामुळे आम्हाला विजय मिळाला, असा मोठा खुलासा आहा ग्रीनने केला आहे. सामना संपल्यावर ग्रीनने हा खुलासा केला आहे. ग्रीनने याबाबत नेमकं काय सांगितलं आहं, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 21 Sep 2022, 5:45 pm
मोहाली : ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतावर दमदार विजय मिळवला. पण ऑस्ट्रेलियाला या विजयाची आयडिया ही भारताच्या हार्दिक पंड्यामुळे मिळाली, असा मोठा खुलासा आता या सामन्यात सामनावीर ठरलेल्या कॅमेरून ग्रीनने केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर


ग्रीनने या सामन्यात भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ग्रीनने यावेळी फक्त ३० चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि ही खेळीच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊन गेली. कारण सुरुवातीला ग्रीनच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला चांगली धावगती राखता आली आणि त्यामुळे त्यांना विजय मिळवणे सुकर झाला. पण या विजयाचे श्रेय ग्रीनने आता हार्दिक पंड्याला दिले आहे.

ग्रीनने यावेळी सांगितले की, " मी खरं तर सलामीला जात नाही. मी तळाच्या फळीत फलंदाजी करतो. पण यावेळी मला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठीही हा धक्काच होता. सलामीला जाऊन कशी फलंदाजी करायची, हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. मला दडपण आले होते. पण हे दडपण हार्दिक पंड्यामुळे कमी झाले. हार्दिक हा एक जबरदस्त फलंदाज आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. या सामन्यात हार्दिकने झंझावाती फलंदाजी केली. या खेळपट्टीवर कशी फटकेबाजी करायची, हे मी हार्दिककडून शिकलो. या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, हे हार्दिकने मला शिकवले आणि त्यामुळेच मला चांगली फलंदाजी करता आली. या सामन्यात मी फक्त हार्दिकला फॉलो करत गेलो आणि मला यश मिळाले."

ग्रीनने यावेळी पुढे सांगितले की, " विश्वचषकापूर्वी हा संघात एक प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग करताना आरोन फिंच हा माझ्याबरोबर होता. त्यामुळे या गोष्टीचाही मला फायदा झाला. पण त्यापूर्वी भारताने फलंदाजी केली होती. अखेरच्या षटकांमध्ये भारताने आपली धावगती वाढवली आणि त्यामध्ये हार्दिकचा मोठा वाटा होता. त्यामुळे तीच गोष्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला झंझावाती सुरुवात करता आली आणि त्यामुळेच विजय मिळवणे कठीण होऊन बसले नाही."
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख