नवी मुंबई : अष्टपैलू हार्दिक पंड्याने डी. वाय. पाटील टी-२० कपमध्ये रिलायन्स-१ संघाकडून खेळताना पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली. त्याने बीपीसीएलविरुद्ध ५५ चेंडूंत १५८ धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने २० षटकार व ६ चौकार लगावले. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर रिलायन्स-१ संघाने २० षटकांत ४ बाद २३८ धावांपर्यंत मजल मारली. पंड्याने ३९ चेंडूंतच शतक पूर्ण केले होते. पंड्याने संदीप शर्मा (०/३७), डीसूझा (१/५६), शिवम दुबे (१/४०), परिक्षित वळसंगकर (०/२८), सागर उदेशी (०/४५), राहुल त्रिपाठी (२/३२) या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. प्रत्युत्तरादाखल बीपीसीएलचा संघ १३४ धावांत गारद झाला. रिलायन्स-१ संघाने १०४ धावांनी विजय मिळवला. हार्दिकने एक विकेटही घेतली. याच लढतीत भारताचा सलामीवीर शिखर धवनही खेळला. मात्र, त्याला तीन धावाच करता आल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारने एक विकेट घेतली. भुवी, धवन आणि पंड्या दोन्ही दुखापतीतून सावरत आहेत. या तिघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.
तुफान आलंया...हार्दिक पंड्यानं कुटल्या ५५ चेंडूंत १५८ धावा
अष्टपैलू हार्दिक पंड्याने डी. वाय. पाटील टी-२० कपमध्ये रिलायन्स-१ संघाकडून खेळताना पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली. त्याने बीपीसीएलविरुद्ध ५५ चेंडूंत १५८ धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने २० षटकार व ६ चौकार लगावले.
महाराष्ट्र टाइम्स 7 Mar 2020, 7:23 am