अ‍ॅपशहर

IND vs AUS: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिककडे कर्णधारपद

IND vs AUS ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये केएल राहुल, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2023, 6:19 pm
मुंबई: भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तीन सामान्यांची वनडे मालिकाही भारताच्या भूमीवर खेळायची आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने ट्रॉफी भारतातच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या मालिकेत अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत, त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India for IND vs AUS ODI series


१७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत एक बदल झाला आहे. परंतु प्रथमच हार्दिक पांड्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे कारण कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने प्रथमच मुख्य निवडकर्त्याशिवाय संघाची निवड केली.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठीही निवड समितीने संघ जाहीर केला. पहिल्या दोन कसोटींसाठी निवडलेला संघच येथे कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे मालिकेनंतर वनडे संघामध्ये यावेळी काही बदल करण्यात आले आहेत.


टीम इंडियाचे हिरो संघात परतले

१७ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत काही मोठे खेळाडू परतले आहेत. यामध्ये सर्वात खास नाव आहे स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचे, जो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करत दोन्ही कसोटीत बॅट आणि चेंडूने आपली चमकदार कामगिरी दाखवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला आणि संघाला २-० अशी आघाडी मिळवण्यात मोलाचा वाट उचलला. जडेजाच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाला आणखी बळ मिळेल हे निश्चित.


वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख