अ‍ॅपशहर

Ind vs Nz ODI Series - पावसाने टीम इंडियाच्या विजयाच्या आशांवर फिरवलं पाणी, मालिका हातातून गेली?

Ind vs Nz 2nd ODI match called off - भारत विरुद्ध न्यूझीलंड या सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामना निकाल न लागताच सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताच्या हातातून ही मालिका गेली की पुढे काय होणार जाणून घेऊया.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2022, 1:33 pm
हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (२७ नोव्हेंबर) रोजी हॅमिल्टन येथे खेळवला जात होता. दोन्ही संघ आपापल्या संघांमधील बदलांसहित सामना खेळण्यासाठी तयार होते. पण सामना सुरु होण्याआधीपासूनच पाऊस सामन्यावर नजर ठेवून होता. अखेरीस सततच्या पावसामुळे हा दुसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India vs New Zealand 2nd Odi match Called of due to rain


न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताचे सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल हे प्रथम फलंदाजीसाठी गेले. सुरुवातीच्या षटकांमध्ये गिलने चौकार मारत आणि धवनने त्याला स्थान देत या दोघांनी ४.५ षटकांत नाबाद २२ धाव केल्या. पण ५वे शतक पूर्ण होण्यापूर्वीच पावसाने पुन्हा हजेरी लावली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली, त्यामुळे हा सामना २९ षटकांचा करण्यात आला.

वाचा: किंग कोहली क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ

सामना जिथे थांबला तिथूनच पुन्हा सुरुवात झाली. ५वे षटक साऊथी टाकत होता, त्यामुळे सामन्याला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर साऊथीने पाचव्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला. सक्तीच्या मध्यांतरानंतर लगेचच, मॅट हेन्रीने कर्णधार धवनला ३ धावांवर पुन्हा तंबूत धाडले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि गिल यांनी भारताची बाजू सावरत शानदार फटकेबाजी केली.

हेही वाचा: संधी मिळताच संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू पुन्हा संघाबाहेर, मात्र

शुभमन गिलने ४२ चेंडूत ४५ धावा तर सूर्यकुमार यादवने आपल्या शानदार अंदाजात २५ चेंडूत ३४ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली. पावसाने पुन्हा या सामन्यात व्यत्यय आणला. त्या क्षणी भारत १२.५ षटकात १ बाद ८९ धावांवर फलंदाजी करत होता. पण हा सुरु झालेला पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता आणि निश्चित वेळेपर्यंत सामना पुन्हा सुरु होणे शक्य नसल्याने पंचांनी दोन्ही कर्णधारांशी संवाद साधत हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

वाचा: जगभरातले कॅप्टन मॅच खेळत आहेत आणि रोहित..., हिटमॅनवर का भडकले आकाश चोप्रा?

यजमानांनी या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी कायम राखली आहे. या पावसाच्या व्यत्ययामुळे भारताच्या ही मालिका जिंकण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. भारताने तिसरा एकदिवसीय सामना जरी जिंकला तर ही मालिका टाय म्हणून घोषित केली जाईल. या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हे दोन्ही संघ शेवटचे क्राईस्टचर्च येथे एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख