अ‍ॅपशहर

जय शहा यांनी थोपवले पाकिस्तानचे आक्रमण, आशिया स्पर्धेच्या बैठकीत नेमकं काय झालं जाणून घ्या

IND v PAK : भारत व पाकिस्तान यांच्या क्रिकेट मंडळात जोरदार वाद झाल्याचे आता समोर आले आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या बैठकीत नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 7 Feb 2023, 9:59 pm
नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेच्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. पाकिस्तान जोरदार आक्रमण करत होते. पण त्याचवेळी जय शहा यांनी पाकिस्तानचे हे आक्रमण कसे थोपवून लावले, याची माहिती आता समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs PAK


आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताचे जय शहा आणि पाकिस्तानचे नजम सेठी यांच्यात चांगलाच वाद झाला. 'आम्ही आशिया कप; तसेच चॅम्पियन्स करंडकचे यजमानपद सोडणार नाही,' असे सेठी यांनी शहा यांना ठामपणे सांगितले, असा दावा पाकिस्तान बोर्डाच्या सूत्रांनी केला आहे. सेठी यांनी बहामात झालेल्या या बैठकीस रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्यानंतरच पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतल्याचा अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला. आशिया कप स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानात यायलाच हवे यासाठी सेठी आग्रही होते. सुरक्षेची पूर्ण ग्वाही दिल्यानंतरही भारतीय संघ का येत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघाला तेथील सरकार मंजूरी देणार नसेल, तर वर्ल्ड कपमध्ये आमचा संघही खेळणार नाही, असे सेठी यांनी शहा यांना सांगितले. शहा यांनी आशियाई; तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांची सांगड घालू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यानंतरही सेठी आक्रमक झाल्यामुळेच आशियाई कप स्पर्धेच्या संयोजनाबाबत अंतिम निर्णय मार्चपर्यंत लांबणीवर गेल्याचे समजते.

आशिया कप क्रिकेट स्पर्धा मूळ कार्यक्रमानुसार सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात होणार होती. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्यत्र होईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते. त्यानंतर पाक बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानही वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. नजम सेठी यांनी पाक बोर्डाची सूत्रे हाती घेतल्यावर चर्चेची तयारी दाखवली होती. मात्र, आता आशियाई क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्यत्र होईल, असा अंतिम निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला आहे आणि स्पर्धेचे नवे ठिकाण मार्चमध्ये ठरेल असे संकेत दिले आहेत. त्यानंतर पाकिस्तान आक्रमक झाले आहेत.

पाक बोर्डाचे आक्रमण
आशियाई कप; तसेच चॅम्पियन्स स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले. त्या वेळी भारताने आक्षेप का घेतला नाही, अशी विचारणाही सेठी यांनी शहा यांना केली. दरम्यान, श्रीलंका; तसेच बांगलादेशनेही आशिया कप स्पर्धेसाठी पाकला जाण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे पाक बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख