अ‍ॅपशहर

U19 Cricket World Cup 2022: धक्कादायक... भारताच्या क्रिकेट संघात करोनाचे आक्रमण, सहा खेळाडू सापडले पॉझिटीव्ह...

U19 Cricket World Cup 2022: बुधवारी भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कर्णधारासह भारतीय संघातील एकूण सहा खेळाडूंना करोनाची बाधा झाली असून त्या सर्वांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Maharashtra Times 20 Jan 2022, 8:29 am
नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक गोष्ट आज समोर आली आहे. भारताच्या क्रिकेट संघावर करोनाने आक्रमण केल्याचे आज पाहायला मिळाले. कारण भारतीय संघातील सहा खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतीय क्रिकेट संघ


भारताचा आज सामना युवा विश्वचषकात (१९-वर्षांखालील क्रिकेट) आयर्लंडबरोबर होणार होता. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारताच्या संघावर करोनाने आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या संघातील कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार एस.के. रशिद यांच्यासह सहा खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यासाठी निशांत सिंधूची हंगामी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. कर्णधार यश आणि उपकर्णधार रशिद यांच्यासह भारतीय संघातील सिद्धार्थ यादव, आराध्य यादव, वासू वत्स आणि मानव परख हे सर्व खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे आता समोर आले आहे.

भारतीय संघातील सहा जणांना करोनाची लागण झाली असली तरी आयर्लंडबरोबरचा क्रिकेट विश्वचषकातील सामना रद्द करण्यात आला नाही. यावेळी निशांतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना खेळला. कारण या विश्वचषकासाठी १७ सदस्यांचा संघ नेण्यात आला होता आणि हीच गोष्ट भारतीय संघाच्या पथ्यावर पडली. कारण साधारणपणे कोणत्याही स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा संघ निवडण्यात येतो. पण जर पंधरा सदस्यांचा संघ असला असता आणि त्यामधील सहा जणांना करोना झाला असता तर भारताला हा सामना खेळता आला नसता. पण भारताने १७ सदस्यांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवल्यामुळे एवढ्या मोठ्या धक्क्यानंतरही त्यांना सामना खेळता आला. आयर्लंडविरुद्च्या सामन्यात एवढा मोठा धक्का बसूनही भारताने धडाकेबाज फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने ५ बाद ३०७ अशी मजल मारली होती. या सामन्यात भारताला १६४ धावांची दमदार सलामी मिळाली. भारताच्या हरनूर सिंगने ८८ आणि अंगरिश रघुवंशीने ७९ धावांची खेळी साकारत संघाला दणक्यात सुरुवात करून दिली. करोनाच्या या मोठ्या धक्क्याचा कोणताही परीणाम भारतीय संघावर झाला नसल्याचेच पाहायला मिळाले.

महत्वाचे लेख