अ‍ॅपशहर

नागपूरच्या मैदानातून गांगुलीने पळ काढला होता अन् तीच पुनरावृत्ती यावेळी द्रविड यांनी टाळली

IND vs AUS : नागपूर कसोटीमध्ये सौरव गांगुलीने पळ काढल्याचे पाहायला मिळाले होते. पण यावेळी मात्र राहुल द्रविड यांनी मात्र ही तीच गोष्ट टाळली आहे. जाणून घ्या काय घडलं...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 7 Feb 2023, 7:41 pm
नागपूर : सौरव गांगुली हा आक्रमक कर्णधार असल्याचे म्हटले जाते. गांगुली जेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना नागपूरला होता. पण नागपूरच्या मैदानातून गांगुलीने त्यावेळी पळ काढला होता आणि राहुल द्रविड यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. हीच गोष्ट यावेळीही घडली असती. पण द्रविड यांनी या गोष्टीची पुनरावृत्ती टाळली. ही गोष्ट नेमकी आहे तरी काय, हे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs AUS

नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या...
ही गोष्ट आहे ती २००४ सालची. त्यावेळी गांगुली भारताचा कर्णधार होता. ऑस्ट्रेलियाता संघ समोर होता. सामना नागपूरच्या जामठा मैदानात होता. पण गांगुली जेव्हा सरावासाठी मैदानात गेला त्यावेळीच त्याने पळ काढला होता. आपण हा सामना खेळणार नसल्याचे त्याने सांगितले आणि मैदान सोडले. गांगुलीने मैदान सोडण्याचे कारण ही खेळपट्टी होती. कारण खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आले होते आणि ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारताला नाचवणार ही खुणगाठ गांगुलीने मनाशी बांधली होती. गांगुली संघाबाहेर गेल्यावर द्रविड यांच्याकडे संघाचे कर्णधारपद आले. द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. कारण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने भारताच्या ९ फलंदाजांना बाद केले आणि त्यामुळेच भारताला सामना गमवावा लागला होता. भारताला या सामन्यात ३४२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. हीच गोष्ट यावेळी होणार असल्याचे दिसत होते. पण द्रविड यांनी ही पुनरावृत्ती टाळल्याचे पाहायला मिळाले.

कारण द्रविड जेव्हा आता प्रशिक्षक झाल्यावर मैदानात उतरले होते तेव्हा ते प्रथम खेळपट्टी पाहायला गेले. यावेळीही जामठाच्या खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आले होते. पण यावेळी द्रविड यांच्यासाठी गेला अनुभव कामी आला. त्यामुळे त्यांनी ज्या खेळपट्टीवर गवत होते त्याची निवड केली नाही. द्रविड यांनी गवत नसलेला खेळपट्टी यावेळी निवडली. त्यामुळे द्रविड यांचा गतअनुभव यावेळी चांगलाच कामी आल्याचे पाहायला मिळाले. जर द्रविड यांनी खेळपट्टी बदलली नसती तर भारतीय संघातही तशीच गोष्ट पाहायला मिळू शकली असती. पण चाणाक्ष द्रविड यांनी ही गोष्ट वेळीच ओळखली आणि ती गोष्ट टाळल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या पहिल्या नागपूर कसोटीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता आता सर्वांना असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख