अ‍ॅपशहर

रोहितने सलामीच्या जोडीचा वाद संपुष्टात आणला; पाहा विराट कोहलीबाबत काय म्हणाला...

Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासन टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेच्या आधी माध्यमांशी बोलताना कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपच्या सलामीचा वाद संपुष्टात आणला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2022, 8:34 am
मोहाली: ‘माझ्यासह विराट कोहली (virat kohli ) सलामीला येऊ शकतो, हादेखील एक चांगला पर्याय आहे. मात्र, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी माझ्यासह लोकेश राहुलच सलामीला येणार,’ असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma)ने सांगून सलामीच्या जोडीचा वाद संपुष्टात आणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma


भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान मंगळवारपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. त्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत रोहितने ही टिप्पणी केली. ‘काही सामन्यांत विराटला सलामीला खेळण्याची शक्यता आहे. याबाबतची चर्चा राहुल भाईंसोबत (द्रविड) झाली आहे. विराट आमचा तिसरा सलामीवीर आहे. मागील लढतीत तो राहुलसह सलामीला खेळला होता. सलामीला येऊन त्याने केलेल्या कामगिरीबाबत आम्ही आनंदित आहोत. अर्थात वर्ल्ड कपमध्ये माझ्यासह राहुलच सलामीला येणार आहे. सलामीच्या जोडीबाबत आता आम्ही कुठलाही प्रयोग करणार नाही,’ असे रोहितने स्पष्ट केले.

वाचा- मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली; भारताच्या स्टार खेळाडूची वाटते...

अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया कप टी-२० लढतीत कोहलीने सलामीला येऊन शतकाचा दुष्काळ संपविला. त्याने नोव्हेंबर २०१९नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. राहुलच्या ‘स्ट्राइक रेट’वर शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यात आशिया कपमध्ये कोहलीला सुरू गवसला. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये रोहितसह कोहली सलामीला खेळणार अशी चर्चा सुरू होती. ‘मागील दोन-तीन वर्षांत लोकेश राहुलने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सलामीच्या जोडीबाबत आमच्यात पुरेशी स्पष्टता आहे. बाहेर काय खिचडी शिजते आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आमच्यात तरी सलामी जोडीबाबत कुठलाही गोंधळ नाही. राहुल आमचा मॅच विनर आहे. आम्ही कुठलाही अतिरिक्त सलामीवीर निवडलेला नाही. विराट आयपीएलमध्ये सलामीला येतो. त्याचाही पर्याय आमच्याकडे आहे,’ असे रोहितने सांगितले.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूने एका वाक्यात आफ्रिदीची बोलती बंद केली; दिला होता हा फुकटचा...

आता केवळ सहा सामने

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कप सुरु होणार आहे. भारताची सलामीची लढत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. त्याआधी भारतीय संघ केवळ सहा आंतरराष्ट्रीय टी-२० सामने (ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने) खेळणार आहे. भारताचा वर्ल्ड कप संघही निश्चित आहे. तेव्हा खेळाडूंनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून पुढील सहा सामन्यांत स्वत:च्या खेळात काही नवीन गोष्टी जोडाव्यात, असेही रोहितने सांगितले. ‘आता आपली निवड होईल की नाही, असा कुठलाही दबाव खेळाडूंवर नाही. वर्ल्ड कपपूर्वीच्या मालिकांसाठीही संघाची निवड आम्ही आधीच निश्चित करून खेळाडूंमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आशिया कपमधील संघच जवळपास कायम ठेवला आहे. पुढील सहा सामन्यांत वेगळ्या शैलीनेही काय साध्य करू शकतो, याचे प्रयोग करता येतील. नव्या गोष्टींसाठी खेळाडूंवर कुठलीही मर्यादा घातलेली नाही. तेव्हा मर्यादेच्या सीमा ओलांडून खेळाडूंनी कामगिरी केली पाहिजे,’ अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली.

गोलंदाजांनाही वाव

भारतीय कर्णधाराने संघास गोलंदाजांकडून असलेल्या अपेक्षाही स्पष्ट केल्या. ‘एखाद्या फलंदाजाला रिव्हर्स स्वीप मारता येत नसले, तर त्याने आपल्याला योग्य फटका मारून बघायला हवा. अशा अनेक फटक्यांबाबत करता येईल. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला सामोरे जाल तेव्हा, तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे हवीत. आगामी सहा सामन्यांत गोलंदाजांनाही वेगळे प्रयोग करण्याची संधी आहे. त्यांनी पहिल्याच स्पेलमध्ये यॉर्कर किंवा बाउन्सर टाकायला हरकत नाही,’ असेही रोहितने सांगितले.

रोहित शर्मा म्हणाला...

- आम्ही वर्ल्ड कपमध्ये आक्रमकबाणा कायम राखणार. अर्थात, सुरुवातीलाच अडचणीत आलो, तरी योजना तयार.

- आमची स्थिती दहा धावांत तीन बाद अशी असेल, तर कसे खेळायचे आणि बिनबाद ५० अशी असेल, तर कसे खेळायचे याची खेळाडूंना चांगली जाण.

- आशिया कपमध्ये आमचा थोडक्यात पराभव. अशा वेळी तुम्हाला नशिबाचीही साथ आवश्यक असते

- वर्ल्ड कपमध्ये नशिबाची साथ मिळेल, ही अपेक्षा

- या सहा लढतीनंतर आम्ही संघातील प्रत्येकाचे विश्लेषण करणार

- वर्ल्ड कपमध्ये नेमके काय करायला हवे, याचा विचार होणार.

- अर्शदीपने प्रभावी मारा केला आहे. दबावाच्या स्थितीतही तो उत्तम यॉर्कर टाकतो. हे नक्कीच सोपे नाही.

- त्याने आयपीएलमध्ये चमक दाखवली आहे. तो एक गुणी गोलंदाज आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज