अ‍ॅपशहर

विराट कोहलीने का घेतला टी-२० क्रिकेटमधून ब्रेक, समोर आलं आता खरं कारण

Virat Kohli: विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून आता ब्रेक घेतला आहे. आता तो थेट आयपीएलमध्येच टी-२० क्रिकेट खेळताना दिसेल. ही गोष्ट कोहलीने बीसीसीआयला कळवली होती. पण विराट कोहली आता टी-२० क्रिकेटमधून ब्रेक का घेत आहे, याचे मुख्य कारणही समोर आले आहे. कोहलीने आता टी-२० क्रिकेटमधून का ब्रेक घेतला, जाणून घ्या....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 30 Dec 2022, 9:40 am
नवी दिल्ली : विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट लढतींमधून ताप्तुरता 'ब्रेक' घेण्याचा निर्णय घेतल्याचे आता समोर येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होण्यापूर्वी विराट कोहलीने हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण कोहलीने आता टी-२० क्रिकेटमधून ब्रेक नेमका का घेतला आहे, याचे कारणही आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India
सौजन्य-ट्विटर


ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीने लक्षणीय कामगिरी केली होती. त्या वेळी त्याने वर्ल्ड कपपूर्वी पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे कामगिरी उंचावल्याचे सांगितले होते. आता नव्या वर्षात वन-डे वर्ल्ड कप भारतात आहे. त्यामुळे वन-डे आणि कसोटीवरच त्याने लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. तूर्तास त्याने आयपीएलपर्यंत पूर्णपणे आंतरराष्ट्रीय टी-२०त 'ब्रेक' घेतला असल्याचे समजते. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा खेळू शकणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. आपण टी-२० मालिकेसाठी अनुपलब्ध असल्याचे कोहलीने कळवले असल्याच्या वृत्तास बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. त्याच वेळी कोहली कुटुंबीयांसह श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दरम्यान सुटीवर जाणार आहे. मात्र, तो वन-डे मालिकेत खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयने आगामी टी-२० लढतींसाठी संघ निवडताना २०२४ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. २०२४मधील वर्ल्ड कप विंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. कोहली आगामी लढतींत न खेळल्यास विविध पर्यायांचा विचार करणे निवड समिती; तसेच भारतीय संघव्यवस्थापनास शक्य होईल. केवळ कोहलीच नव्हे, तर रोहित शर्माविनाही वर्ल्ड कपसाठी पूर्वतयारी सुरू करण्याचा विचार आहे. आपण २०२४चा टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता कमी आहे, याची ३४ वर्षीय कोहलीला पूर्ण जाणीव आहे, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कोहली यावर्षी फक्त आणि फक्त जास्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. कारण हा विश्वचषक कोहली, रोहित यांचा अखेरचा ठरू शकतो, अशी चिन्ह आहेत. त्यामुळे हा विश्वचषक गाजवण्यासाठी कोहली आणि रोहितसारखे दिग्गज खेळाडू टी-२० क्रिकेटपेक्षा आता वनडे क्रिकेटवर जास्त लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख