अ‍ॅपशहर

रोहित शर्माला भर मैदानातून अचानक पळ का काढावा लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं...

Rohit Sharma : रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार आहे, पण तो किती शांत आणि नम्र आहे, हे यावेळी इरफान पठाणने सांगितले. रोहित यावेळी मैदानात सराव करत होता. त्यावेळी त्याला बोलावण्यात आले. पण रोहितने त्यावेळी एकंदर सूर पाहिला आणि तिथून पळ काढला. रोहितने असं नेमकं का केलं, पाहा व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 1 Sep 2022, 7:32 pm
दुबई : रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण आशिया चषक स्पर्धा सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की रोहितला मैदानातून अचानक पळ काढावा लागला. यावेळी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणही मैदानात उपस्थित होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma
सौजन्य-ट्विटर

आशिया चषकाच्या सामन्यासाठी रोहित जोरदार तयारी करत होता. भारतीय संघाचाही त्यावेळी सराव सुरु होता. त्यामुळे आता भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, याची चर्चा समालोचक करत होते. यामध्ये इरफान आणि भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांचाही समावेश होता. रोहित त्यांच्या बाजूलाच सराव करत होता. पण जेव्हा त्यांची नजर रोहितकडे वळली तेव्हा त्याने तिथून पळ काढला.

जतीन सप्रू हा इरफान आणि बांगर यांच्याबरोबर चर्चा करत होता. त्यावेळी भारतीय संघात हार्दिक पंड्याला संधी मिळणार की कोणाला, याबाबत तो बोलत होता. त्यानंतर खेळाडू कितीही असले तरी कर्णधार हा एकच असतो आणि तो आहे रोहित शर्मा, असे बोलत जतिनने रोहितला मुलाखतीसाठी आमंत्रण दिले. त्यावेळी रोहित आणि इरफान हे दोघे बोलत होते. रोहितने यावेळी जतिन नेमका कोणत्या सूरात हे सर्व बोलतोय, हे ऐकत होता. त्यामुळे आता नेमकं काय होणार, याची कल्पना कदाचित त्याला आली. त्यामुळे रोहितेन तिथून पळ काढल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी इरफान पठाण म्हणाला की, " रोहित शर्माला मी २००७ च्या विश्वचषकापासून ओळखतो. त्यावेळी आम्ही एकत्र संघात खेळत होतो. पण रोहित तेव्हा जसा होता, तसाच आजही आहे. रोहितमध्ये कोणताच बदल झालेला नाही. रोहित हा एक शांत पण हुशार खेळाडू आहे. रोहित २००७ मध्ये एक युवा खेळाडू होता आणि आता तो भारताचा कर्णधार झाला आहे. पण त्याच्या स्वभावात कोणताच बदल झालेला नाही. तो अजूनही तसाच शांत आहे."

रोहित आता भारताचा कर्णधार आहे. पण तरीही तो शांत आणि नम्र असतो, यावरूनच त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, हे दिसून येते.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख