वृत्तसंस्था, कराची
खेळाडूंची आपापसातील भांडणे आणि कर्णधार सर्फराझबद्दलच्या नाराजीचा फटका बसल्याने पाकिस्तानने भारताविरुद्धची महत्त्वाची वनडे वर्ल्डकप लढत गमावली, असे म्हणत पाकिस्तान संघाला त्यांच्या मीडियाने घरचा अहेर दिला आहे. पाकिस्तानमध्येही क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्धचा कोणताही पराभव आणि विशेषतः वर्ल्डकपमधील पराभव पाकिस्तानवासीयांच्या जिव्हारी लागतो.
रविवारच्या पराभवानंतर पाकिस्तानी मीडियाने त्यांच्या संघातच सुरू असलेल्या गटबाजीबाबत बातम्या दिल्या आहेत. तसेच संघातील काही खेळाडूंना कर्णधार म्हणून सर्फराझ पसंत नाही, तशी नाराजी ते उघड व्यक्त करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 'समा' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार लढतीनंतर सर्फराझचा संयम सुटला आणि ड्रेसिंगरूममध्ये त्याने इमाद वसिम आणि इमाम उल हक यांना चांगलेच धारेवर धरले. इमाद आणि इमाम हे संघात आपल्याविरुद्ध गटबाजीचे राजकारण खेळत असून त्याला सहकार्य करत नाहीत, असा सर्फराझचा आरोप आहे. 'दुनिया' या वृत्तवाहिनीनेही असेच वृत्त दिले असून मोहम्मद आमीर आणि इमाद यांचे वेगवेगळे गट आहेत जे सर्फराझला कमी लेखत राहतात, असे म्हटले आहे.
भारताआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतरही एका प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हॉइस एसएमएस टाकून पराभवाचे खापर शोएब मलिक, इमाद, इनाम आणि बाबर यांच्यावर फोडले होते. याबाबत पाकिस्तान संघाने मात्र गटबाजीच्या वृत्ताचा इन्कार केला; पण लढतीनंतर ड्रेसिंगरुममध्ये आल्यावर सर्फराझचा पारा चढल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचा राग कर्णधारा म्हणून होता, पण त्याने कुणावर गटबाजीचे आरोप केले नाहीत, असे एका खेळाडूने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.