वृत्तसंस्था, कोलकाता
खांद्याच्या दुखापतीमुळे सध्या विश्रांती घेत असलेला यष्टीरक्षक वृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परतण्याची खात्री बाळगून आहे. जुलैमध्ये त्याच्या खांद्यावरील दुखापतीसाठी उपचार सुरू होते. आता त्याची दुखापत बरी झाली आहे आणि तो पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे.
३४ वर्षीय वृद्धिमान साहा म्हणतो की, मला आता बरे वाटते आहे. डिसेंबरच्या मध्यात मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळू लागेन. त्यानुसार माझी तयारी सुरू झाली आहे. मला आशा आहे की, माझी प्रकृती तोपर्यंत पूर्णपणे सुधारेल आणि रणजी करंडक स्पर्धेत मी खेळू शकेन. सध्या मी नेटमध्ये सराव सुरू केला आहे, पण सामन्यासाठी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
हे वर्ष साहासाठी वेदनादायी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत केपटाऊनला दुखापतीमुळे त्याला पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतावे लागले. आयपीएलमध्ये त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि जूनमधील अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीला तो मुकला. मात्र नंतर त्याने जाहीर केले की, त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यासाठी त्याने इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही केली.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात ऋषभ पंत आणि पार्थिव पटेल यांची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर कोणतीही कसोटी मालिका नसल्यामुळे तूर्तास वृद्धिमानला स्थानिक क्रिकेटमध्येच आपले नशीब आजमावे लागणार आहे.
वृद्धिमान म्हणतो की, प्रत्येकालाच आपली तंदुरुस्ती स्थानिक क्रिकेटमधून सिद्ध करावी लागते. तिथे सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त असणे आवश्यक आहे आणि मगच आपण संघनिवडीसाठी सज्ज राहू शकतो.
दुखापतीनंतर ज्या पुनर्वसनासाठी त्याचे प्रयत्न चालू होते, ते कंटाळवाणे होते पण त्यातूनही मी सकारात्मक गोष्टी शिकल्याचे वृद्धिमान म्हणाला.
गांगुली म्हणतो, वृद्धिमान सरस यष्टीरक्षक
वृद्धिमान साहा भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याला बंगालचा माजी कसोटीपटू सौरव गांगुलीचा पूर्ण पाठिंबा आहे. गेल्या पाच ते दहा वर्षातील भारतातला सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान ओळखला जातो, असे गांगुलीने म्हटले आहे. गांगुली म्हणतो की, जवळपास वर्षभर तो भारतीय संघातून बाहेर आहे. पण गेल्या पाच-दहा वर्षातला तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याची प्रकृती लवकर बरी होईल, अशी अपेक्षा आहे.