अ‍ॅपशहर

...तर नवे चेहेरे शोधावे लागतील

'भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरत असतील, तर नवे चेहेरे शोधण्याची गरज आहे,' असा सज्जड इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी दिला आहे.

Maharashtra Times 17 Sep 2018, 3:53 am
नवी दिल्ली : 'भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरत असतील, तर नवे चेहेरे शोधण्याची गरज आहे,' असा सज्जड इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हे मत मांडले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if players dont deliver we need to look at new faces msk
...तर नवे चेहेरे शोधावे लागतील


'भारत-इंग्लंड मालिका चुरशीची झाली. या मालिकेत भारताच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडल्या. पाच कसोटींमध्ये मिळून भारतीय गोलंदाजांनी ६० हून अधिक विकेट घेतल्या. यांवरून भारतीय गोलंदाजांचे कौशल्य आणि त्यांचा फिटनेस सिद्ध होतो. भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबतही मी समाधानी आहे. मात्र, फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल,' असे प्रसाद म्हणाले. त्याचप्रमाणे, गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघातील तळाचे फलंदाज झटपट बाद करण्याकडेही लक्ष द्यायला हवे. त्याचा फटका आपल्याला या मालिकेत बसल्याचेही त्यांनी सांगितले. भारताची सलामी जोडी संपूर्ण मालिकेत अपयशी ठरल्याचे प्रसाद यांनी मान्य केले. मात्र, इंग्लंडमधील खेळपट्ट्या व वातावरण डावाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल नव्हते आणि इंग्लंडची सलामी जोडीही अपयशीच ठरली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे कसोटी संघातील अनुभवी फलंदाज असून, त्यांनी काही सामन्यात चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांना अधिक सातत्य ठेवावे लागेल, असेही प्रसाद म्हणाले.

'पुरेशा संधी दिल्यानंतरही खेळाडू अपेक्षित कामगिरी करत नसतील, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये, तसेच भारत 'अ' संघातर्फे यशस्वी कामगिरी करणाऱ्या युवा केळाडूंना संधी देण्याची गरज आहे,' असेही प्रसाद यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, सध्या संघाबाहेर असलेल्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही निवड समिती नियमितपणे लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट वेळोवेळी आम्हाला या खेळाडूंविषयी माहिती देत आहेत. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या फिटनेसची आम्हाला पुरेशी माहिती होती. आयपीएलदरम्यान, भारतीय खेळाडूंच्या फिटनेसविषयीचे अहवालही निवड समितीला प्राप्त होतात. त्यामुळे निवड समितीने खेळाडूंच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले, ही टीका मला अजिबात मान्य नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

'ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत काळजी घेऊ'

आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याविषयी बोलताना, कसोटीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, तसेच खेळाडूंना तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी वर्ल्ड कपही आठ महिन्यांवर येऊन ठेपला असून, वर्ल्ड कपपूर्वी भारत २४ वन-डे सामने खेळणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही ब्लू प्रिंट तयार केली असल्याचे ते म्हणाले. मागील अठरा महिने निवड समितीमध्ये केवळ तीनच सदस्य होते. आता गगन खोडा आणि जतीन परांजपे यांचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात आल्याने सदस्यसंख्या पुन्हा पाचवर पोहोचली आहे. या नव्या सदस्यांचेही प्रसाद यांनी स्वागत केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज