दिल्ली:
जर कर्णधार विराट कोहलीचं नशीब चांगलं राहिलं तर भारतच हा विश्वचषक जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने नुकतीच रिकी पॉंटिंगची मुलाखत घेतली असून या मुलाखतीत विराट कोहली, सचिव तेंडुलकर, आयपीएल, वर्ल्डकप या सगळ्याबद्दल आपली मतं दिलखुलासपणे व्यक्त केली आहे.
'विराट कोहलीचा वनडेमधील रेकॉर्ड अविश्वसनीय आहे. तो अत्यंत उत्तम फलंदाजी करतो आहे. त्याच्यामुळेच भारताचा संघ मला अत्यंत खतरनाक वाटतो. जर विराटचं नशीब चांगलं असेल तर भारतच हा विश्वचषक जिंकेल' असं पॉंटिंगने सांगितलं आहे.
तसंच धोनीने गेल्या काही वर्षात केलेली प्रगतीही वाखाडण्याजोगी आहे असंही त्याने सांगितलं आहे.'महेंद्रसिंग धोनी २०१५ विश्वचषकानंतर निवृत्ती घेईल असं मला वाटलं होतं. पण तसं काहीच झालं नाही. त्याने त्याचा खेळ बराच सुधारला आहे. त्याची प्रगती अभूतपूर्व असून कौतुकास्पद आहे'.
आयपीएलमध्ये रिकी पॉंटिंग यंदा दिल्ली कॅपिटल्स या संघाचे मार्गदर्शन करतो आहे. आता पॉंटिंगचे शब्द खरे ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.