अ‍ॅपशहर

रोहित शर्माला झालंय काय? अवघे ५ चेंडू खेळून माघारी; BCCIकडून महत्त्वाचे अपडेट, फॅन्स चिंतेत

IND vs WI 3rd T20I: भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा पराभव करून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतानं विंडीजवर ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यातून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2022, 1:45 pm
भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा पराभव करून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतानं विंडीजवर ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यातून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma injury
भारतीय कर्णधार रोहित शर्मा


भारतीय संघ १६५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरला. कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला. ५ चेंडूंमध्ये त्यानं ११ धावा केल्या. त्यात प्रत्येकी एक चौकार आणि षटकार होता. ११ धावांवर असताना रोहित शर्माला शारीरिक समस्या जाणवू लागली. वैद्यकीय पथकानं मैदानात येऊन रोहितला तपासलं.

रोहितला कंबरेत त्रास सुरू होता. मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. त्यामुळे रोहितला वेदना सुरू झाल्या. रोहितनं पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) रोहितच्या प्रकृतीची माहिती देणारं एक ट्विट केलं. रोहितला कंबरदुखीचा त्रास होत आहे. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे, असं बीसीसीआयनं ट्विटमध्ये म्हटलं.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं दुखापतीवर फारसं भाष्य केलं नाही. 'आता वेदना थोड्या कमी झाल्या आहेत. मालिकेतील चौथ्या सामन्याआधी आमच्याकडे थोडा वेळ आहे. त्यामुळे दुखापत बरी होईल अशी आशा आहे', असं रोहित म्हणाला.
IND vs WI: सूर्या इज बॅक... रोहित शर्मा नसतानाही भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी
तिसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजनं प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. कायल मेयर्सनं ७३ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरादाखल भारतानं १९ षटकांत ३ बाद १६५ धावा केल्या. सलामीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं ४४ चेंडूंत ७६ धावांची आक्रमक खेळी केली. यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

महत्वाचे लेख