आयसीसीचे कार्यकारी अधिकारी रिचर्डसन यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था, कराची
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित वर्ल्डकप सामन्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना कोणतीही चिंता वाटत नाही. आयसीसीशी केलेल्या कराराला भारत आणि पाकिस्तान बोर्ड बांधील आहेत, त्यामुळे हा सामना होईलच, याची खात्री रिचर्डसन देत आहेत.
पुलवामा येथे झालेल्या भारतीय जवानांवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीतही भारताने खेळू नये, असा आग्रह चाहत्यांकडून धरला गेला. पण आयसीसी मात्र हा सामना होणारच यावर ठाम आहे.
रिचर्डसन म्हणतात की, आयसीसीच्या सर्व स्पर्धांसाठी सदस्य राष्ट्रांनी करार केलेले आहेत. त्यानुसार त्यांना या स्पर्धांत सहभागी व्हावे लागेल. जर त्या अटींची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांना त्याचा दंड गुणांच्या रूपात सहन करावा लागेल.
भारतीय क्रिकेट बोर्डानेही आयसीसीला पत्र लिहून दहशतवाद पसरविणाऱ्या देशांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवाय, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गडद हिरव्या रंगाच्या लष्करी टोप्या परिधान केल्यामुळे पाकिस्तानने आक्षेप नोंदविला होता. पण भारताने तशी परवानगी घेतल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते.
या दोन देशांत द्विराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याबाबत रिचर्डसन यांना विचारल्यावर ते म्हणाले की, तो या दोन देशांचा प्रश्न आहे. पण पाकिस्तानबाबतचे मत हळूहळू बदलू लागले असून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळविण्यासंदर्भात सदस्य राष्ट्रांचे मन वळविण्यात आयसीसीला यश येत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडू सहभागी झाले होते, त्याबद्दलही रिचर्डसन यांनी या खेळाडूंचे आभार मानले.